2014 पासून आत्मनिर्भर भारत अर्थात मेक इन इंडिया पॉलिसीमुळे मोदी सरकारची भारतातच नव्हेतर विदेशातही वाहवा होत आहे. अर्थात या आत्मनिर्भर योजनेमुळे देशाचे आणि लोकांचे किती हित झाले आहे, हा संशोधनाचा विषय असला तरी मेक इन इंडिया पॉलिसी हाही एक एनडीएच्या येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीतील अजेंडा असणार आहे. टी. एन. शेषन हे 1990 ते 96 या कालावधीमध्ये देशाचे निवडणूक आयुक्त होते. आदर्श आचारसंहिता कशी असावी, याचा पायंडा त्यांनी पाडून देशालाच नव्हे, तर देशाबाहेरील यंत्रणांनाही तोंडात बोटे घालायला लावली होती. याच आदर्श आचारसंहितेमधील एक नियम म्हणजे, देशातील निवडणुकांदरम्यान आत्मरक्षणासाठी दिल्या गेलेल्या परवानाधारक बंदुका जमा करणे. टी. एन. शेषन यांच्या अगोदरच्या कार्यकाळातही असा नियम प्रचलित होता. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विशेषत: उत्तर भारतामध्ये अशाच परवानाधारक बंदुकांमधून गोळीबार करीत लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात असे. एकूणच टी. एन. शेषन हे सर्व जाणून होते. बंदुका या सरंजामशाहीचे प्रतिक असल्याने या बंदुका जमा करुन याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला बंधनकारक केल्याने उत्तर भारतामध्ये बंदुकीच्या गोळीबारातून निवडणूक काळात होणारा हिंसाचार कमी करण्यास त्या काळामध्ये निवडणूक आयोगाला शक्य झाले होते. देशात 18व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीमधील 7 टप्प्यांमध्ये 543 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणुका निर्भयपणे आणि सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसलेली आहे. सालाबादप्रमाणे याही निवडणुकीमध्ये आत्मसंरक्षणासाठी देण्यात आलेल्या परवानाधारक बंदुका त्वरित जमा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संबंधित पोलीस ठाण्यांना बंदुका जमा करण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक भारतामध्ये बंदूक परवाना मिळवणे हे फारच जिकिरीचे आणि किचकट काम आहे. विविध बाबींची पडताळणी केल्यानंतरच संबंधितांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्यात येतो. यामध्ये रायफल, रिव्हॉल्व्हर किंवा पिस्टलचा समावेश असतो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अग्नीशस्त्र आयातीला चाप लावत मेक इन इंडिया गन पॉलिसीला चालना दिली होती. 1986 साली याबाबत केंद्र शासनाने कायदा पारित केला. त्यानुसार, देशातील ऑर्डिनेन्स फॅक्टर्यांमध्ये रिव्हॉल्व्हर आणि पिस्टलची निर्मिती होवू लागली. प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील कानपूर, तसेच पश्चिम बंगाल येथील कोसिपूर येथे या बंदुकांची निर्मिती होवू लागली. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात वापरले जाणारे वेबले स्कॉट या इंग्लंड मधील कंपनीचे रिव्हॉल्व्हर व एफएन व ब्राऊनिंग कंपनीच्या बनावटीचे पिस्टल भारतातील आयुध निर्मिती (ऑर्डिनेन्स फॅक्टर्या) कारखान्यांमध्ये उत्पादन उत्पादित होवू लागले. अमेरिकन, ब्रिटीश, जर्मन बनावटीची अग्नीशस्त्रे वापरणार्यांना भारतीय सरकारी कारखान्यांमध्ये तयार होणारी अग्नीशस्त्रे वापरण्यास कसनुसे वाटू लागले. परंतू पर्याय नव्हता. 1986 च्या अगोदर आयात केलेल्या अग्नीशस्त्रांचे भाव गगनाला भिडले. लखपती माणसांना परवाना मिळाल्यानंतर त्यांच्याही आवाक्यात ही शस्त्रे येत नसल्याने नाईलाजाने त्यांना ऑडिनेन्स फॅक्टरी निर्मित शस्त्रेच नाईलाजाने विकत घ्यावी लागत. परंतू पर्याय नव्हता. ज्यांना बॅरेटा, कोल्ट, स्मिथ ऍण्ड मॅसन, ग्लॉक कंपनीचे पिस्टल वापरण्याची सवय होती , त्यांच्यादृष्टीने इंडियन ऑर्डिनेन्स फॅक्टरी बनावटीची पिस्टल व रिव्हॉल्व्हर्स ‘लोहाराने’ बनवलेली खेळणी होती. परंतू 2014 नंतर भारतीय बंदूक प्रेमींना दिलासा मिळाला. 1986 सालचा बंदूक आयात कायदा केंद्र सरकारने उठवला नसला तरी मेक इन इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारने म्हणजेच गृहमंत्रालयाने देशातील शेकडो कंपन्यांना खासगी बंदूक निर्मिती परवाना दिला असून देशाच्या कानाकोपर्यामध्ये बंदूक कारखान्यांनी पिस्टल, रिव्हॉल्व्हर तसेच रायफल निर्मितीस सुरुवात केली आहे. यामध्ये मुख्यत्वे अदानी ग्रुप, मलहोत्रा सन्स, वेबलेस कॉट यांच्यासह सुमारे शंभरभर कंपन्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रियन कंपनी ग्लॉक, अमेरिकन कंपनी कोल्ट, स्मिथ ऍण्ड मेसन यांच्यासह इटालियन कंपनी बॅरेटाचाही या विदेशी कंपन्याही भारतातील विविध कंपन्यांशी भागिदारी करुन आपली उत्पादने देशाच्या बाजारपेठेत विकण्यास सज्ज झाली आहेत. ज्या-ज्या देशांनी आतापर्यंत बंदूक वापराबाबत उदार धोरण अवलंबले, त्या-त्या देशाला याची जबर किंमत मोजावी लागली आहे, हे आपण अमेरिकेत होत असलेल्या हिंसाचाराच्या निमित्ताने बघत आलेलो आहोत. 2023 सालामध्ये सार्वजनिक ठिकाणी 630 गोळीबाराच्या घटना अमेरिकेत घडलेल्या होत्या. यामध्ये शेकडो लोकांचा बळीही गेला होता. मात्र, असे असूनही जो बायडेन सरकार बंदूक वापराबाबत कोणतेही निर्बंध घालत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बंदूक वापराबाबतचे वेगवेगळे नियम व कायदे आहेत. या पळवाटांमुळेच अमेरिकन सरकारला बंदूक वापराबाबत पूर्णपणे नियंत्रण आणता येत नाही. 2024 च्या अमेरिकन गन डेटानुसार अमेरिकेतील प्रत्येक 100 माणसांमागे 120 बंदूका आहेत. तर भारतामध्ये लाखांमध्ये 0.5 टक्केही नाही. अर्थात आपली परिस्थिती बरी म्हणायची. परंतू ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांसाठी बंदुकांची निर्मिती करण्यात आली, त्याचा फटकाही तेवढ्याच प्रमाणात त्या देशाला बसला आहे. भारत सरकारने अर्थात गृहमंत्रालयाने खासगी कंपन्यांना बंदूक निर्मितीचे परवाने खिरापतीसारखे वाटले तरी त्याचा फटका येत्या काळामध्ये सामान्य नागरिकांना बसू नये, याची काळजीही केंद्र शासनाने घ्यायला हवी. त्याचे कारणही असे आहे की, जानेवारी 2024 मध्ये दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको या देशाने अमेरिकेतीलच न्यायालयात अमेरिकन बंदूक उत्पादक कंपनी असणार्या कोल्ट, स्मिथ ऍण्ड बेसन, ग्लॉक आणि बेरेटा विरोधात 10 मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे. मेक्सिकोने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, 2015 ते 2021 या कार्यकाळात वरील बंदूक कंपन्यांनी आपली शस्त्रे तस्करी करुन अमेरिकेतून मेक्सिकोतील विविध गुन्हेगारी टोळ्यांना पोहोचविल्यामुळे या टोळ्यांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये 1 लाख 40 हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या होणार्या हत्याकांडाला या बंदूक कंपन्याच जबाबदार असल्याचा आरोपही मेक्सिकन सरकारने केला आहे. अर्थात हा खटला जर मेक्सिकोमधील न्यायालयात दाखल केला असता तर या बंदूक उत्पादक कंपन्यांना काहीएक फरक पडला नसला. परंतू मेक्सिकन सरकारने हा खटला अमेरिकेतीलच न्यायालयात दाखल करुन जगाचे लक्ष वेधले आहे. कोल्ट, स्मिथ ऍण्ड बेसन, ग्लॉक आणि बेरेटा यासारख्या बंदूक उत्पादक कंपन्या मेक्सिको, कोलंबिया, बोलोविया, व्हेनेझुएला, एक्वाडोर येथील गुन्हेगारी टोळ्या आणि अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज माफियांना बंदूक पुरवठादार आहेत. गेल्या तीन दशकामध्ये याच बंदूकांमधून सुटलेल्या गोळ्यांनी लाखो लोकांचा जीव घेतलेला आहे आणि याच रक्तरंजित व्यवसायातून अमेरिकन बंदूक उत्पादक कंपन्यांनी शेकडो बिलियन डॉलर्स कमवलेले आहेत. सामान्य माणसाच्या रक्तपातातून सरकारे येतात, आणि पडतात. बंदूक आणि दारुगोळ्यातून कमविणार्या कंपन्यांनाही कोट्यवधींचा फायदा होतो. परंतू याची मोठी किंमत मात्र समाजाला चुकवावी लागत असते. ऑस्ट्रियाचा युवराज ऑच्युड्यूक फ्रांझ फर्डिनंड याची बोस्नियाची राजधानी सेरेजोवा येथे ग्राव्हिलो प्रिन्सीप नावाच्या एकाने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे युरोपियन ऐक्याच्या एकदम ठिकर्या उडाल्या होत्या. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांनी बोस्नियामध्ये झालेल्या ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर टाकला. यातूनच युरोपियन देशांमध्ये खटके उडाले. ऑस्ट्रिया आणि सर्वियामध्ये सुरु झालेल्या युद्धाचे लोण संपूर्ण युरोपभर पसरले आणि यातूनच पहिल्या जागतिक महायुद्धाची ठिणगी पडली. एफ-एन 1910 बनावटीच्या 0.38 पिस्टलमधून झाडलेली गोळी पहिल्या जागतिक महायुद्धाची नांदी ठरली. या सुटलेल्या गोळीने सुमारे 20 लाख लोकांचा जीव घेतला. बंदूकांचे उदात्तीकरण वाईटच. सैन्य, निमलष्करी दले आणि पोलिसांसाठी आधुनिक शस्त्रे असावीत, हे मान्य. परंतू सामान्य लोकांच्या हातात जर घातक, स्वयंचलित शस्त्रे आल्यानंतर काय होवू शकते, हे आपण अमेरिकेत घडणारे गोळीबार आणि त्यातून होणारे हत्याकांतून आपण बघत आहोत. या घटनांमुळे अमेरिकन सरकारही हतबल झाले आहे. मध्यंतरी कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी इस्त्रायल बनावटीची ‘टेवोर’ ही अतिशय घातक असणारी स्वयंचलित रायफल अदानी ग्रुप बनवत असल्याने मोठी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधींनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये काही ना काहीतरी तथ्य असावे. त्यामुळेच त्यांनी अदानी बनवित असलेल्या रायफलवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. 90 च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटित गुन्हेगारी बोकाळलेली होती. गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित तसेच विदेशी बनावटीच्या अग्नीशस्त्रांचा वापर करुन मुंबईच्या सडकांवर दिवसाढवळ्या मुडदे पाडून रक्तपात केला जायचा. परंतू मुंबई पोलिसांनी एन्काऊंटरचे अस्त्र वापरायला सुरुवात केल्यानंतर मुंबईतील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड झाला. स्वयंचलित परदेशी बनावटीची अग्नीशस्त्र मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आली. त्यामुळे गोळीबाराला चटावलेले हातघाईच्या लढाईत पुरते फेल झाले आणि पर्यायाने धगधगणारी मुंबई काही अर्थाने शमून गेली. गुन्हेगारी टोळ्यांकडे स्वयंचलित आणि परदेशी बनावटीच्या शस्त्रांची रसद कमी झाल्यानंतर अनेकांनी बिहारमधील मुंगेर बनावटीच्या अग्नीशस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली. गावठी बनावटीची असलेली ही अग्नीशस्त्रे परदेशी बनावटीच्या अग्नीशस्त्रांसमोर अगदीच तकलादू आहेत. परंतू ही शस्त्रे गेले दशकभर देशभरातील पोलिसांची डोकेदुखी ठरलेली आहे. गेल्या दशकभरात या अग्नीशस्त्राचा वापर करुन गुन्हेगारी टोळ्यांनी शेकडो लोकांना यमसदनी धाडले आहे. परंतू यावरही पोलिसांना आणि यंत्रणांना शंभर टक्के नियंत्रण आणता आलेले नाही, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. हे सगळं सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील शंभरपेक्षा जास्त उत्पादकांना स्वयंचलित अग्नीशस्त्र निर्मिती परवाना दिल्यामुळे येत्या काळात या देशाचाही मेक्सिको होवू नये, याची खबरदारी सरकारनेच घेतली पाहिजे. अमेरिकेसारख्या बलाढ्या महासत्तेलाही बंदूक निर्मिती आणि वापरकर्त्यांवर अद्यापपर्यंत अंकूश ठेवता न आल्याने तेथेही आतापर्यंत शेकडो हत्याकांडे घडलेली आहेत आणि घडताहेत. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अमेरिकेसारखे ‘गन कल्चर’ वाढीस लागले तर त्याला रोखणे अशक्य कोटीतील गोष्ट होवून बसेल.
काय बोलता काय? सातार्यातही बंदूक निर्मिती परवाना?
मेक इन इंडिया पॉलिसीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर शंभर कंपन्यांना बंदूक अर्थात अग्नीशस्त्र निर्मिती परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला असतानाच या शंभरमध्ये सातार्यातही एका कंपनीला शस्त्र निर्मिती परवाना देण्यात आला असून लवकरच या कंपनीत शस्त्रास्त्रांची निर्मिती होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ही कंपनी कुठे होणार, या कंपनीची मालकी कोणाकडे आहे, याबाबत कमालीची गुप्तता संबंधित यंत्रणांकडून पाळण्यात आली आहे.
- संग्राम निकाळजे.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |