सातारा : कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगावर बाका प्रसंग उद्भवला आहे. गेली 60 दिवस जगाचं धावणारं चाक रुतलेलं आहे. दिवसेंदिवस लोकं कोरोना बाधित होताहेत. हजारो-लाखांमध्ये किड्यामुंग्यांसारखी माणसे मरताहेत. परंतू सातारा जिल्ह्यात मात्र वेगळी परिस्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असावा मात्र तो माझ्या घराच्या बाहेर... अशा नीच मनोवृत्ती जोपासून काहीजण याही परिस्थितीमध्ये काही पदरात पडतेय काय, याची चाचपणी करताना दिसून येताहेत. खंडाळ्यातील एशियन पेंटच्या निमित्ताने जिथे जावू, तिथे ‘भाड’ खावू अशा प्रवृत्तींच्या भानगडी समोर आल्या आहेत.
देशभरात मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. चीनने केलेली भानगड चार हजार किलोमीटरचे अंतर तोडून आपल्यापर्यंत येणार नाही, अशी अटकळ अनेकांनी बांधली. परंतू अमेरिकेत, युरोपात हाहाकार माजवलेल्या कोरोनाने भारतात येवून समाजजीवन ढवळून काढले आहे. आतापर्यंत सव्वा लाखाच्या घरातील देशातील कोरोना बाधितांचा आकडा पोहोचलेला आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने वेळीच लॉक डाऊन जाहीर केले नसते तर हा आकडा आतापर्यंत पन्नास लाखांच्या घरात पोहोचला असता, याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. देशभरात व राज्यभरात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परजिल्ह्यातील माणसाला जिल्ह्यात येण्यासाठी परवानग्या काढाव्या लागतात आणि या परवानग्यासुद्धा सहजासहजी मिळत नसल्याने लोकांना मोठे दिव्य पार करावे लागत आहे. असे असताना कायद्याची अंमलबजावणी फक्त गरीबांनीच करायची. महान साहित्यिक तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘कायदा हा श्रीमंताच्या घरची रखेल असल्याप्रमाणे वाकवला जातो.’ जिल्ह्यातील श्रीमंतांनी, पुढार्यांनी गेल्या साठ दिवसांमध्ये जिल्हा प्रसासनाला उल्लू बनवून ऐन लॉक डाऊनमध्ये वेळोवेळी कायदा वाकवला. खंडाळा तहसिलदाराप्रमाणे अनेकांनी जिथे जावू, तिथे भाड खावू असे म्हणत अनेक विस्थापितांनी जिल्ह्याची प्रवेशद्वारे सताड उघडी ठेवली.
गेली वर्षभर खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील एशियन पेंट या कंपनीच्या भानगडी गाजत आहेत. पुणे आणि चाकणमधील जागा संपल्यानंतर अनेक उद्योजक व कारखानदारांनी आपला मोर्चा पुण्यालगत असणार्या शिरवळ-खंडाळ्याकडे वळवला. तत्कालीन सरकारने याठिकाणी सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) म्हणून खंडाळा तालुका जाहीर केला. पावसाळ्यात कुसळही न उगवणार्या खंडाळा तालुक्यातील जमिनींना सोन्याचे मोल आले. जिल्ह्यातील अनेक पुढार्यांनी गरीब शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीने घेवून त्याच जमिनी कारखानदारांना कोट्यवधींना विकल्या. परंतू येथील भूमिपूत्र मात्र माझ्याच जमिनीवर उभ्या केलेल्या कंपनीत काहीतरी काम मिळेल, या आशेवर राहिला. परंतू खंडाळा तालुक्यातील पुढार्यांनी, विशेषत: फलटण तालुक्यातील टग्याने खंडाळा तालुक्यात आपला एकछत्री अंमल बसवला. शिरवळ- खंडाळा-लोणदांत उकिर्डे हुंगत हिंडणार्या बंड्या-खंड्याच्या टोळीने तालुक्यातील कंपन्यांमध्ये भंगार व लेबर ठेकेदारीच्या माध्यमातून चंचूप्रवेश मिळवला. बघता-बघता अनेक कंपन्याही ताब्यात घेतल्या. ज्या भूमिपूत्रांनी आपल्या जमिनी कंपन्यांना दिल्या, त्याच भूमिपूत्रांना बंड्या-खंड्याने कंपन्यांमध्ये अल्प पगारात रोजंदारीवर ठेवून देशोधडीला लावले. त्यामुळे हेच कामगार पुढे कामगार न्यायालयात गेले.
वास्तविक 240 दिवसांपेक्षा अधिक दिवस तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करीत असाल तर नियमानुसार संबंधित कामगाराला त्या कंपनीमध्ये पर्मनंट करुन कंपनीमार्फत सर्वच सोयी-सुविधा देण्यात याव्यात, असा नियम आहे. परंतू फलटणच्या टग्याच्या इशार्यावर बंड्या-खंड्याने हेच भूमिपूत्र पर्मनंट झाले तर त्यांनी कमवलेल्या घामाच्या दामातून आपली बेगमी कशी होणार आणि लाखो रुपये कसे मिळणार? या एकाच विचाराने या 51 कामगारांच्या भविष्याचा मुडदा पाडला. गेली अनेक महिने या भूमिपूत्रांच्या हाताला काम नाही. गेल्याच आठवड्यात सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉक डाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील कंपन्यांना सूट देवून 33 टक्के कामगारांद्वारे काम करण्यास सशर्त परवानगी दिली. म्हणजेच उपलब्ध मनुष्यबळाद्वारे कारखान्यांनी व कंपन्यांनी आपले काम सुरु करावे. असे असताना जिल्ह्यात कामगार उपलब्ध असतानाही एशियन पेंट या कंपनी व्यवस्थापनाने बंड्या-खंड्या व खंडाळा तहसिलदारांना हाताशी धरुन पुण्यातून जिल्हाबंदी असतानाही सुमारे पंधरा कामगार खंडाळ्यात आणले. त्यांची राहण्याची व्यवस्था खंडाळा लगत असलेल्या ‘राजावत’ या हॉटेलमध्ये करण्यात आली. वास्तविक जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हॉटेल्स व लॉजिंग बंद ठेवण्याची सक्त ताकीद असतानाही राजावत या हॉटेलमध्ये त्यांना ठेवलेच कसे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
खंडाळ्यातील ग्रामस्थांना ही भानगड समजल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसमितीच्या माध्यमातून या कामगारांना पोलिसांना ताब्यात घेण्यास भाग पाडले. यानंतर पोलिसांनीही कारवाईचा फार्स करीत त्यांच्यावर जमाव व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले आहे. मात्र एवढे होवूनही प्रश्न संपत नाहीत. यानिमित्ताने स्थानिक पुढारी, पोलीस, तहसिलदार म्हणजेच प्रशासन हातात असेल तर काहीही शक्य होवू शकते, हे समोर आले आहे. सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजेच शिरवळ येथे परजिल्ह्यातून येणार्या लोकांच्या तपासणीसाठी चेक पोस्ट उभे केले आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटाही आहे. असे असताना हे पंधरा कामगार पुणे येथून शिरवळमार्गे खंडाळ्यात पोहोचलेच कसे? एकतर ते आभाळातून पडले असावेत, नाहीतर जमिनीखालून तरी आले असावेत. इतरवेळी परजिल्ह्यातून पास काढून आलेल्या नागरिकांनाही शिरवळच्या चेक पोस्टवर हजारे नावाचा कारभारी नाडवतो. हजारोत-लाखोत तोडपाण्या करुन पुण्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कामगार शिरवळ खंडाळ्यात आणतोय. परवा राजावत मध्ये सापडलेले कामगार हेही शिरवळ पोलीस ठाण्याचे कारभारी उमेश हजारे व खंडाळा तहसिलदार दशरथ काळे यांच्या आशिर्वादानेच आल्याचा आरोप शिरवळ-खंडाळ्यातील अनेक जागरुक नागरिकांनी केलेला आहे. सध्या त्या पंधरा कामगारांना संस्थात्मक विलगीकरण केलेले आहे. त्यांचे तपासणी अहवाल ज्यावेळी येतील तेव्हा येतील. मात्र त्यातील एक कामगारही कोरोना बाधित निघाला तर हे जिल्हा प्रशासनाचेच पाप मानावे लागेल. आतापर्यंत कंपन्यांमधील कामगारांना नाडवून बंड्या-खंड्याने कोट्यवधींच्या तुंबड्या भरल्या. परंतू ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नितीमत्ता तुळईला टांगूण खंडाळा तालुक्यातील दोन्ही अधिकार्यांनी जिथे जावू, तिथे भाड खावू, ही नीती अवलंबल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची विश्वासार्हता मात्र धोक्यात आलेली आहे.
हजारे, काळेंची तत्काळ चौकशी करावी...
खंडाळा येथील एशियन पेंटस या कंपनीतील 15 कामगारांना ऐन लॉक डाऊनमध्येही पुण्याहून तालुक्यात आणून बसवणार्या बंड्या-खंड्यासह त्यांना सहकार्य करणार्या पोलीस निरीक्षक उमेश हजारे व तहसिलदार दशरथ काळे यांची चौकशी करण्यात यावी. तसेच सातारा जिल्ह्यात लॉक डाऊनमध्ये दारुबंदी असताना पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात रिक्षाद्वारे रोज लाखो रुपयांच्या दारुची तस्करी केली जात होती. या रिक्षा प्रकरणातील मुख्य आरोपीला दोन लाखांची तोड करुन कोणी वाचवले, याचा तपासही जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी करावा, अशी मागणीही शिरवळ येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जिथे जावू, तिथे ‘भाड’ खावू !
— Sangram Nikalje (@sangramnike) May 22, 2020
- संग्राम निकाळजे
वाचा सविस्तर...????????????????https://t.co/VdIGgQf9gF pic.twitter.com/KcWyi8BRQN
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |