शिवाजी काळभोर
मिटिंग क्रमांक - २. ४. ५. ६. किंवा कोणता क्रमांक असेल तो. स्थळ - सर्किट हाऊस कराड. वेळ - अपरात्रीची. बहुधा रात्र ते पहाटे दरम्यानची.
याआधी अनेक मिटींगला झाल्या. कधी पाटण कॉलनीत तर कधी कुठे. विषय - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक. सत्ताधारी सुरेश भोसले यांच्या विरुद्ध अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्या मनोमिलनाची मोट बांधणे. मिटिंग मध्ये अविनाश मोहिते फारसे बोलत नव्हते. पण त्यांच्या वतीने एक जण अतिशय तावातावाने अविनाश मोहितेंची म्हणण्यापेक्षा स्वतःची बाजू मांडत होता. समोर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री, विश्वजित कदम असे दिग्गज नेते असल्याचे भान त्याला नव्हते. अनेकदा बाहेर येऊन तो चव्हाण, विश्वजीत कदम यांच्याबद्दल उर्मट व अरे-तुरेची भाषा वापरत होता. आणि पोर्चमधले नेत्यांचे कमालीचे सहनशील समर्थक खाली माना घालून ऐकत होते. अरे तुरे करणारा सभासद असला तरी नेता नव्हता की कार्यकर्ता नव्हता. सगळं धेडगुजरी! महननीय आजी माजी मंत्री आणि त्याच्यात तुलना कशी होणार? पत्रकारांनी लिहून टीका करणे वेगळे आणि समोरासमोर पाणउतारा करणे वेगळे.
कृष्णा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मिटिंग काँग्रेस समर्थकांची होती हे इथे महत्त्वाचे. आणि मिटींगला हजर होते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असूनही श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, जयंत पाटील आदींनी कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडीप्रमाणे निवडणूक करावी, असे त्यांचे मत होते. परंतु त्यांनी कोणत्याही मिटिंगमध्ये भाग घेतला नाही. सत्ताधारी पॅनल कट्टर विरोधी अशा भाजपचे होते. तथापि कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व पृथ्वीराज चव्हाण करतात म्हणून त्यांच्या अधिपत्याखाली हा साखळी कार्यक्रम चालला होता. ते सहाजिकच आहे. यात पश्चातबुद्धी युवा नेतृत्वाचाही समावेश होता. त्यांचा उल्लेख पुढे येईल. शेवटी हे मनोमिलन फिस्कटले. इंद्रजित मोहितेंनी थोडीफार लवचिक भूमिका घेतली पण दोघे एकत्र येऊ शकले नाहीत आणि दोघांचेही पानिपत झाले!
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत निवडणूक पार पडली. सभासदांच्या मनात नेमके काय आहे ते कळले. आता प्रश्न असा पडतो की एरवी सत्तेसाठी हपापलेल्या राष्ट्रवादीने भाजपचा विजय आधीच मान्य केला होता काय? अनेकांनी अनेक कंड्या पिकवल्या. अविनाश मोहिते हे अजित पवारांना साताऱ्यात उभ्याउभ्या भेटून आले. नंतर २७ जूनला शरद पवार येणार म्हणून हुल उठवण्यात आली. नंतर तर कहर झाला. शरद पवार डॉ. अतुल भोसले यांचे आमदारकीचे खूपच ताणलेले स्वप्न पूर्ण करणार व अविनाश मोहिते यांच्याकडे कारखाना चालविण्यास देणार वगैरे वगैरे. काही नेम नाही शरद पवार काय करतील त्याचा! आणि अतुल भोसले कधी पक्ष बदलतील याचाही नेम नाही. शरद पवारांनी नावाला पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम यांच्याबरोबर मीटिंग घेतल्या, पण या कारखान्याच्या निवडणुकीत उत्साह दाखवला नाही. कराड दक्षिणेत राष्ट्रवादी ही जन्माच्या आधीपासून मुडदुस झाल्यासारखी आहे. वाठारकरांपासून ते सिद्ध झाले आहे. तसे मनात आणले असते तर पक्ष बळकटी बरोबर दिग्गज नेते कामाला लावून कारखाना हिसकावून घेणे त्यांना सोपे होते. इंद्रजित मोहिते यांचा प्रश्न मिटला असता तर गणित सोपे झाले असते. मग विरोधकांच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढून उलट्या बोंबा मारणाऱ्या राष्ट्रवादीने हा कारखाना भाजपला आंदण दिला का? असा प्रश्न निर्माण होतो.
सध्या सर्वच उद्योग अडचणीत आहेत. कोरोनाने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. साखर उद्योगही त्याला अपवाद नाही. रोज साखर आयुक्तांनी एफआरपी न दिल्याने कारखान्यांना नोटिसा काढल्याच्या बातम्या येतात. तीन-चार वर्षापूर्वीचेही दर कारखान्यांना उसाला देता येईनात. डॉ. सुरेश भोसले यांना उच्चांकी दर म्हणून २०१६ का १७ चा आकडा प्रचारात दाखवावा लागला. कारखानदारीतील या वाईट बातम्या रोज येत असताना कृष्णा मात्र छानछोकीत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. खरी परिस्थिती ट्रस्टवाल्यांनाच माहीत असली तरी लवकरच ती सभासदांना कळेल. खाजगी सोडले तर जवळपास सर्वच कारखाने अडचणीत आहेत. कर्जबाजारी झाले आहेत. दर नसल्याने साखरेचे साठे कुठे ठेवायचे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कृष्णाही अपवाद नाही. नेमका निकाला दिवशी ईडीचा जरंडेश्वरचा निकाल आला आणि राष्ट्रवादीने या कारखान्याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष केले ही मेख लक्षात आली. भोसलेंची पाचही बोटे तुपात गेली.
तसे पहायला गेले तर कारखाना आला काय आणि गेला काय डॉ. सुरेश भोसले यांना फारसा फरक पडत नाही. जयवंतराव भोसले यांची पुण्याई एवढी मोठी आहे की त्यापेक्षा मोठा पसारा त्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याने निर्माण करून ठेवला आहे. तरीही ते लढले. लढले आणि जिंकले. नको नको म्हटले तरी लक्ष्मी गळ्यात माळ घालते ती अशी! काही वर्षांपूर्वी वाईतल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत हे असेच घडले होते. लक्ष्मणराव पाटील यांनी जंग जंग पछाडूनही कारखाना काही हाती लागला नाही. मदन भोसले यांनी एकहाती विजय संपादन करून प्रतापगड, खंडाळा अशी युनिटे उभारली. नंतरच्या पंचवार्षिकला किसन वीर कारखाना डबघाईला आला. आणि मकरंद पाटलांनी नकोच ती बला, नको तो कारखाना. आपली आमदारकीच बरी म्हणून कारखाना निवडणुकीचा विषयच सोडून दिला. आज किसन वीर कारखान्याची स्थिती किती नाजूक आहे, तुम्ही पाहत आहात. त्यामुळे डॉ. सुरेश भोसले यांना सत्ता येऊनही पुढच्या आव्हानांना तोंड देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसे त्यांचे साम्राज्य मोठे असल्याने त्यांना ते अवघड नाही. तोट्यात फायदा कसा शोधायचा याचे ज्ञान त्यांना नक्कीच आहे!
या कारखान्यातील विजयाच्या रूपाने डॉ. अतुल भोसले यांच्या अंगावर गुलाल पडला. यात सुरेश भोसलेंबरोबरच विनायक भोसलेंची पडद्याआडची भूमिका महत्त्वाची होती हे अनेकांना माहित नाही. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांची युती होऊ नये म्हणून ते काही नुसते देव पाण्यात घालून बसले नव्हते. याबाबत कोणी कोणाला सुपार्या दिल्या हे विषय खाजगीत चवीने चघळले जात आहेत. सर्कीट हाऊसवरच्या मिटींगमध्ये तावातावाने बोलणाराकडेच ते दिशानिर्देश करीत होते. आमदारकीचे मार्ग नुसते सरपंच पदापासूनच नव्हे तर साखर कारखानदारीतूनही जातात. त्यामुळेच की काय कराड उत्तरेत आज जेलात असलेले मनोज घोरपडे आणि विधानसभेत गार झालेले धैर्यशील कदमांनी साखरेत हात घातला. पण अतुल भोसले यांच्या बाबतीत तसे घडलेले नाही. यापुढेही कराड दक्षिणच्या राजकारणात ते कितपत यशस्वी होतील याविषयी शंका आहे. कारण त्यांचा तिसरा विरोधक पहिल्या विरोधकाला सामील झाला आहे.
येथे प्रमुख मुद्दा आहे तो कृष्णा कारखान्याचे पुढचे भवितव्य काय असेल? केंद्रात भोसले यांच्या पक्षाचे सरकार असले तरी राज्यात महाविकास आघाडी आहे. तीही अजित पवारांच्या कंट्रोलमध्ये. त्यामुळे कधी काय होईल याचे भाकीत आत्ताच करणे अवघड आहे. तूर्त कारखान्यावरील कर्जे, ऊसाचे दर, कामगारांची देणी, अनेक वर्षे संचालकपद बळकावून बसलेल्या व अरेरावी करणारांच्या वाढत्या अवास्तव मागण्या, एक्सपान्शन, पहिल्यातून बाहेर येण्याआधीच अविनाश मोहितेंवर नवीन केसेस ठोकणे, या धबडग्यातून जयवंत शुगर चालवणे, ट्रस्टचा व्याप सांभाळणे, पुढील राजकारणासाठी अतुल भोसले यांचे रान साफ करणे अशी अनेक दिव्य कामे त्यांच्या पुढे आहेत. सभासदांचा मतलब ऊस दराशी, तो वेळेवर नेण्याशी, सिंचन व्यवस्थेच्या कर्जांशी आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या व्यापाशी, अतुल भोसलेंच्या आमदारकीशी किंवा फुकट मिळणाऱ्या साखरेशी नाही.
अविनाश मोहिते यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला ऊस दुसऱ्या काट्यावर वजन करून आणावा व कारखान्याच्या वजन काट्यावर परत वजन करावा, कमी भरल्यास एक लाखाचे बक्षीस, अशी घोषणा प्रचारात केली. ते गतवेळेप्रमाणे साधे संचालक म्हणूनही निवडून आले नाहीत हा भाग वेगळा. आले असते तर त्यांनी ते प्रत्यक्षात केले असते असे आपले आपण म्हणुया. म्हणायला काय जातय! सुरेश भोसले ते करतील का? अविनाश मोहिते त्यांना तसे करण्यास भाग पाडतील का?आंदोलन करतील का? हाच नियम भोसले जयवंतला लागू करतील का? हे पुढचे प्रश्न आहेत.
बॉयलर पेटला आणि उसाची पहिली मोळी पडली की मलिदा खाणारी सरकारी टोळी टोळधाडीप्रमाणे बाहेर पडते. साखर सम्राटांकडून मलिदा घेऊन ISO 2002 सारखे, आमक्या कारखान्याचा काटा बरोबर ! तमक्या कारखान्याचा अचूक! अशा बातम्या छापूवून आणल्या जातात. शेतकरी सभासद त्यावर विश्वास ठेवतो. पण या निवडणुकीच्या निमित्ताने अविनाश मोहिते यांनी उचललेला काटामारीतून सावध करण्याचा मुद्दा महाराष्ट्रभर पेटेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर शेतकरी संघटनांनी भूमिका घेतली पाहिजे. सभासद शेतकऱ्यांनी शेअर्स काढून कारखाने काढले तसे वर्गणी काढून पर्यायी काटे कारखान्यांच्या आसपास उभारले पाहिजेत... (क्रमश:)
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |