सातारा : राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या काल रात्री सातार्यात झालेल्या सभेने सातार्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह राज्यातील विधानसभा निवडणुकीत जान आणली आहे. मोदी आणि फडणवीसांच्या लाटेतही शरद पवारांच्या ‘त्या’ पावसातील भाषणाने महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये सहानुभूतीची लाट आली आहे, असे चित्र सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांमध्ये दिसून आले. 80 वर्षाचे दोन म्हातारे अस्मानी आणि सुलतानी टोळधाडीला परतवून लावण्यासाठी सातारच्या क्रांतीभूमीवर भरपावसात उभे ठाकले. करोडो मराठी जनांच्या हृदयामध्ये अस्मितेची ठिणगी चेतवली. एकूणच काल झालेल्या सातार्यातील सभेमुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा नूर पलटवण्यात शरद पवारांना काही अंशी यश आले आहे, असे आपण म्हणू शकतो.
कालपासूनच राज्यासहित देशभरातील पत्रकार, राजकीय समिक्षकांसह सोशल मीडियावरही त्या पावसातील सभेसंदर्भात हातभर लेख प्रसिद्ध झाले. सभेतील व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर टचकन् डोळ्यात पाणी येते, मन अक्षरश: गलबलून जाते. पवारांचा हा करिष्मा म्हणायचा की, अपरिहार्यता? हे सांगणे कठीण असले तरी तानाजी पडल्यानंतर 80 वर्षाच्या शेलारमामाने तलवारीने उदयभानाच्या दोन फाकळ्या करुन लढवय्ये कधीच म्हातारे नसतात, हे दाखवून दिले. ‘मामाने मारलं उड्डाणाला, आन् दात खावून केलं वाराला, उभा चिरला उदयभानाला’ या शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्याची आठवण कालची सभा ऐकल्या आणि बघितल्यानंतर येते. 60 च्या दशकात महाविद्यालयीन जिवनात राजकपूरच्या चोरी-चोरी या चित्रपटातील ‘ये रात भीगी भीगी, ये मस्त फिजाएं... उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा’ हे गाणे 'जावा' गाडीवर बसून भरपावसात पुण्यातील रस्त्यांवर हुंदडणार्या दोन जिवलग दोस्तांना तब्बल 60 वर्षानंतर सातारच्या जिल्हा परिषद मैदानावर आळवावे लागले. हेही नसे थोडके. कोणती गोष्ट कधी, कुठे, कशी पथ्थ्यावर पडेल, हे कोणी सांगू शकत नाही. पण काल नियती आणि निसर्गाने हे सर्व जुळवून आणले? सातार्यात पवारांच्या अनेकदा तोफा धडाडल्या पण वय आणि आजारपणाचे भांडवल न करता पवार भरपावसातही त्वेषाने लढले, हे सातारच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नमूद करावी अशी कालची सभा आहे.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करुन राज्यातील बहुजन समाजातील अनेक मुले राजकारणात आणली. त्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवले. शरद पवारही या विकेंद्रीकरणापैकी एक. पवारांचे राजकारण प्रथमपासूनच वादळी ठरले. कमी वयात आमदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय पदावर राहिल्यामुळे पवारांच्या महत्त्चाकांक्षाही वाढल्या. प्रसंगी पवारांना राजकारणात तडजोडीही कराव्या लागल्या. मग त्या उद्योगपतींशी असोत, बिल्डरांशी असोत अथवा राज्यातील सरंजाम्यांशी असोत. परंतू या तडजोडींमुळे पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाणांनी बहुजन समाजातील नेतृत्व पुढे आणण्यासाठी सातारा जिल्ह्यासह राज्यातील सरंजाम्यांना गढीच्या आणि वाड्यांच्या बाहेर येवू दिले नाही. त्यामुळेच शरद पवारांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. परंतू शरद पवारांनी यशवंत विचारांच्या नेमके उलटे केले. बहुजन समाजातील अनेक नेत्यांना देशोधडीला लावून त्यांचे राजकारण संपवले(त्यापैकी एक म्हणजे प्रतापराव भोसले आणि चिमणराव कदम). प्रसंगी राज्यातील सरंजाम्यांना रेड कार्पेट टाकून त्यांना राजकारणात आणले. मनी, मसल आणि सामाजिक ताकद वापरुन सरंजाम्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या साथीने महाराष्ट्राच्या राजकारणावर अंमल प्रस्थापित केला. शेवटी जे पेरणार, तेच उगवणार. शरद पवारांनीही जे पेरले, तेच आता उगवत आहे. उस्मानाबादच्या पद्मसिंह पाटलांसारख्या आप्तेष्टांनीही अडचणीच्या काळात पवारांचा हात सोडला. मग त्याला सातारचे उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे तरी कसे अपवाद असणार? ईडीच्या भानगडीत मध्यंतरी अजित पवारांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पडद्यामागे जोरदार हालचाली घडत होत्या. मात्र पवारांना आपल्या घरातील वादळ शमवण्यात यश आले. पवारांच्या घरातूनच उसळलेल्या त्सुनामीमुळे मात्र महाराष्ट्राचे राजकारण या लाटेत वाहून गेले असते.
अंगावरील हळद उतरायची वाट नववधूसुद्धा बघत असते. परंतू सातार्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी हळद उतरण्याच्या आतच म्हणजे तीन महिन्यांच्या आतच आपल्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक उदयनराजेंचा मूळचा पिंड हा भाजपचाच. परंतू राजकीय साठेमारीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास त्यांना करावा लागला. 2009 आणि 2014 या लोकसभा निवडणूकांमध्ये उदयनराजेंना राष्ट्रवादीतून तिकिट देणे ही पवारांची अपरिहार्यता होती. उदयनराजेंसारखा माणूस आपल्याला परवडणार नाही, असे पवार अनेकदा खाजगीत बोलत असायचे. मतदारसंघ पुनर्रचनेत कराड हा लोकसभा मतदारसंघ विसर्जित झाल्यानंतर पवारांचे खास दोस्त-यार श्रीनिवास पाटील उपरे झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटीलही 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी हटून बसले होते. मात्र डॉ. बुधाजीराव मुळीकांनी मारलेल्या खुट्टीमुळे उदयनराजे फ्रंटफूटवर आले. कोणाच्या गावीही नसताना उदयनराजेंना निमूटपणे तिकिट द्यावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीतील पवारांचे खास समजले जाणारे श्रीनिवास पाटील, लक्ष्मणराव पाटील आणि रामराजेंचीही तळपायाची आग मस्तकाला गेली. ‘ही ब्याद आता उरावरच घेतलीय तर भोगा’ असा सल्लाही त्यावेळी त्यांनी पवारांना दिला. पण पवारांच्या डोक्यात कसेही करुन दिल्लीच्या तख्तावर बसायचे असल्यामुळे पवारांनी या सर्वांकडे दुर्लक्ष केले. अनुक्रमे 2009, 2014 ला पवारांच्या महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचल्या होत्या. परंतू कोणाच्या गावीही नसलेल्या नरेंद्र मोदींनी पवारांच्या महत्त्वाकांक्षांचा चक्काचूराडा केला. 1999 साली जन्म दिलेल्या पक्षाला आता कसेतरी जगवले पाहिजे, हे डोक्यात ठेवून पवारांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली. मात्र गेल्या पाच वर्षात सत्तेविणा पवारांची कोंडी झाली. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर बुकलून बुकलून राष्ट्रवादीत घेतलेले अनेक सरंजामदार भाजप-शिवसेनेत जाऊ लागले. जे पवारांनी केले, तेच त्यांच्याबाबत होवू लागले. यामुळे पवार अस्वस्थ होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जाणार, जाणार अशा आवयाही उठल्या. परंतू उदयनराजेंनी राष्ट्रवादीसोबत राहण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादींतर्गत विरोध, भाजप-सेनेने दिलेला तगडा उमेदवार. अशातही उदयनराजे दीड लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. इकडे अंगावर गुलालाची लाली असतानाच सातार्यातील ग्रेड सेपरेटर, कास तलावाची उंची ही कामे मात्र गोगलगाईच्या गतीने सुरु होती. उदयनराजेंनी भाजप प्रवेश केला हे एव्हाना सूर्यप्रकाशाइतके नितळ झाले आहे. परंतू सातार्याचा बालेकिल्ला धाराशायी होवू द्यायचा नसेल तर उदयनराजेंना अस्मान दाखवले पाहिजे, हे डोक्यात ठेवून पवारांनी 80 वर्षाच्या म्हातार्याला उभे केले. माझ्या बारशातलं जेवण श्रीनिवास पाटील जेवले होते. सातार्यात सुरु असलेल्या राजकीय कलगीतुर्यात याचा उल्लेख उदयनराजेंनी वेळोवेळी केलेला आहे. प्रशासकीय अधिकारी, दोनवेळा खासदारकी, एकवेळा राज्यपालपद आणि अजूनही यावयात सत्तेची हाव जात नाही, अशा पद्धतीचे आरोप भाजपसह उदयनराजेंकडून श्रीनिवास पाटलांवर करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दोन लोकसभा, एक-दोन अपवाद सोडल्यास सर्वच्यासर्व विधानसभेच्या जागा, स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायट्या आदी सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकल्या. पण त्या बदल्यात राष्ट्रवादीने जिल्ह्याला काय दिले, तर 'घंटा'... कारण, पवारांना सातार्याचा विकास करायचा नव्हता. विकास केला तर लोकं शहाणी होतात आणि शहाणी लोकं आपल्या पाठिमागं राहत नाहीत, हे पवारांचे पहिल्यापासूनचे कॅलक्यूलेशन. बारामतीत विकासाच्या पुरामध्ये लोक बुडत असताना सातारा मात्र विकासाच्या दुष्काळात होरपळत होता. 15 वर्षाच्या सत्तेमध्ये शरद पवारांनी सातार्याचा फक्त वापर करुन घेतला. सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडवले गेले. त्याची अंदाजपत्रके वाढविण्यात आली. परंतू कायम दुष्काळी आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे माण-खटाव, फलटण-खंडाळा, कोरेगाव उत्तर हे तालुके पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम कोणी केले, हे जिल्ह्यातील शेंबडं पोरगंही सांगू शकेल. सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय. परंतू सातार्यात आल्यानंतर हे शहर आहे की सुधारित खेडं आहे? असा लोकांना प्रश्न पडतो. पवार सभेत बोलले, 15 वर्षे तुमच्या हातात सत्ता होती. मग तुम्ही काय केलं? परंतू सत्तेची सूत्र तर पवारांच्या हातात होती ना? गेल्या 15 वर्षात सातार्यातील जे महत्त्वाचे प्रश्न होते, ते सत्तेत असूनही राष्ट्रवादीला सोडवता आले नाहीत. यामध्ये सातारा शहराला पुढील पन्नास वर्षांपर्यंत उपयुक्त असलेले ग्रेड सेपरेटर, कास तलावाची उंची, सातारा येथील शासकीय महाविद्यालय, किल्ले अजिंक्यतार्याचे संवर्धन असे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या एका विनंतीवरुन मान्य केले व ते मूर्त स्वरुपातही येत आहेत.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या उदयनराजेंच्या वाढदिवसावर राष्ट्रवादीच्या आमदारांसह विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बहिष्कार टाकला होता. स्वपक्षीय खासदाराच्या वाढदिवसाला खुद्द पक्षप्रमुख हजर असताना आमदार व विधान परिषदेच्या सभापतीने बहिष्कार टाकणे हे योग्य आहे काय? असा सवालही उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने विचारला होता. ज्या पवारांच्या सावलीला उभे राहण्यासही राष्ट्रवादीतील आमदार-खासदार बिचकतात. त्या पवारांची विनंती धुडकावून लावत उदयनराजेंच्या वाढदिवसावर बहिष्कार टाकणे, ही न पटण्यासारखी गोष्ट आहे. एका हाताने कुरवळायचे आणि दुसर्या हाताने बुकलून काढायचे, ही पवारांची जुनी नीती आहे. उदयनराजेंच्या बाबतीतही पवारांनी हीच नीती वापरली होती. एकीकडे उदयनराजेंना कुरवळायचे व दुसरीकडे उदयनराजेंना नडणार्या पक्षातील पुढार्यांना बळ द्यायचे. हे धोरण अवलंबल्यामुळेच उदयनराजेंची राष्ट्रवादीत घुसमट होत होती. परंतू राष्ट्रवादीला धडा शिकवायचा, या एका हेतूनेच उदयनराजेंनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला, हे आता येथे पुन्हा सांगण्याची गरज नाही. सत्तेत नसतानाही शरद पवारांनी फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकरांना विधानसभेच्या सभापतीपदावर बसवले. उदयनराजेंना प्रथमपासून विरोध रामराजेंनीच केला. जिल्ह्याचा पुढारी होण्याच्या नादात रामराजेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी आपल्या कुरापतींनी संपवली. लोकसभा निवडणूकांअगोदर म्हणजे चार महिन्यांपूर्वी मिस्टर रामराजेंनी भाजपमध्ये सेटिंग लावली होती. परंतू मिस्टर रामराजेंची लायकी भाजपला माहित असल्यामुळे त्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. शेवटपर्यंत भाजपात घेतील, अशा आशेवर असणार्या रामराजेंना भाजपने शेवटपर्यंत हिंग लावून विचारले नाही. येवू नको, तर कुठल्या गाडीत बसू? अशी परिस्थिती मिस्टर रामराजेंची झाली असताना भाजप की शिवसेना? या पेचात अडकलेल्या रामराजेंना शेवटी त्यांचा फलटणचा उमेदवार राष्ट्रवादीतून उभा करावा लागला. पवारांनाही एव्हाना रामराजेंच्या सगळ्या भानगडी समजल्या होत्या. परंतू दिवस धामधुमीचे आहेत, शत्रूला गोटात घेवून शत्रूकडून शत्रूचा काटा काढण्याचे कसब पवारांमध्ये आहे. मिस्टर रामराजेंनी काल सातार्यात येवून कॉलर उडवली खरी पण त्याला उदयनराजेंची सर आली नाही. सिगरेट हवेत उडवून ती पेटवण्याचे काम फक्त रजनीकांतनेच करावे. येरा-गबाळ्याचे ते काम नव्हे, हे कोणीतरी मिस्टर रामराजेंना सांगायला हवे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सातार्यात संध्याकाळचा पाऊस पडतोय. खबरदारी म्हणून सिंचनातून कमवलेल्या कोट्यवधींच्या निधीमधून राष्ट्रवादीला कालच्या सांगता सभेसाठी पर्जन्यरोधक मंडप उभारणे शक्य होते. परंतू प्राप्त परिस्थितीचा राजकीय फायदा व भांडवल कसे करुन घ्यायचे, याचे कसब शरद पवारांनी 6 दशकाच्या राजकारणात चांगलेच कमवले आहे. काल झालेली सभा वादळी होती. पण त्याचे मार्केटिंग परफेक्ट झाले. मोदींच्या सभेनंतर आपली सातार्यात हवा करायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले होते. पाऊस सुरु असताना छत्री उपलब्ध होती. ती डोक्यावर घेतली असती तर काय बिघडले असते? 20 वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाल्यानंतर या कॅन्सरशी दोन हात करीत पवारांनी मृत्यूवरही मात केली. त्यासाठी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती असावी लागते. या जोरावरच पवारांची आजवरची वाटचाल राहिलेली आहे. परंतू सध्या पवार आजारी असतात. अशा आजारपणातही ते महाराष्ट्र पिंजून काढताहेत, ही काय खायची गोष्ट नव्हे. परंतू अती धाडस कधी-कधी अंगलट येवू शकते. काल झालेल्या पावसात पवारांनी भिजत-भिजत भाषण केले. उपस्थितांच्या काळजाला हात घातला. परंतू ते पावसात भिजल्यानंतर पवारांना झालेल्या जखमांचे इन्फेक्शन वाढू शकते. सध्या वातावरण घाणेरडे झाले आहे. व्हायरल आजाराने लोक बाधीत होत आहेत. असे असताना पवारांनी भलतेच धाडस दाखवले. खरेतर हे राजकारण आहे. परंतू या राजकारणामुळे आपल्या तब्येतीवर त्यावर विपरित परिणाम होवू न देण्याची खबरदारी पवारांनी घ्यायला हवी होती. कारण यशवंतराव चव्हाणांनंतर त्या उंचीचा नेता महाराष्ट्राच्या या मातीला पवारांच्या रुपाने मिळालेला आहे. हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजूनही काही वर्षे दिमाखाने वावरला पाहिजे, ही लोकांची अपेक्षा आहे. बाकी काल झालेला इव्हेंट उत्तम होता. या इव्हेंटमुळे मात्र महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. मात्र 24 तारखेलाच या इव्हेंटसह निवडणुकीचा रागरंग समजणार आहे.
- संग्राम निकाळजे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |