02:13pm | Jul 12, 2023 |
सातारा धगधगतोय... गेल्या काही महिन्यांपासून याच आणि अशाकाही हेडलाईन्स सामान्य सातारकरांना धडकी भरवताहेत. अभूतपूर्व अशा गुन्हेगारी कारवायांनी सातार्यात डोके वरती काढले आहे. सातार्यातील चिल्ल्या-पिल्ल्यांनी अग्नीशस्त्रे परजून मिर्झापूर आणि धनबादचाही विक्रम मोडित काढायचे ठरवलेले आहे. परंतू कायद्याची अंमलबजावणी करणारे मात्र या चिल्ल्या-पिल्ल्यांपुढे हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
सुमारे 17 वर्षांपूर्वी सातारा पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर डीडी सिंगचा एन्काऊंटर करुन आमच्याकडे केवळ शोभेच्या आणि गंजलेल्या बंदुका नसल्याचे दाखवून दिले होते. तत्कालीन डीवायएसपी विश्वास पांढरे यांनी बर्चा घेवून अंगावर धावून आलेल्या डीडी सिंगला आपल्या 9 एमएम पिस्तुलातून धडाधड राऊंड फायर करीत त्याला यमसदनी धाडले होते. डीडी सिंगचा एन्काऊंटर जरी सातार्यात झाला असला तरी या एन्काऊंटरमुळे धगधगते पुणे शहर आणि परिसर शांत झाला होता. काही दशकांची डीडी सिंग आणि त्याच्या टोळीची दहशत मोडित निघाली होती. सातार्यातील या पहिल्यावहिल्या एन्काऊंटरमुळे सातारा पोलिसांची तुलना त्यावेळी काहींनी मुंबई पोलिसांशीही केली होती. कायदा हातात घेतल्यास आम्हीही बंदुका हातात घेतो आणि वेळप्रसंगी त्या चालवूही शकतो, हे सातारा पोलिसांनी डंके की चोट पर दाखवून दिले होते. एन्काऊंटर ची दहशत ही पुढे काही काळ राहिलीही. परंतू, काळे सोने अर्थात वाळू च्या उपशातून मिळणार्या अमाप पैशामुळे जिल्ह्यातील अनेक नामचीन गुन्हेगारांची मतीही गुंग झाली. वाळूतून पैसा, त्या पैशातून गुंडगिरी आणि गुंडगिरीतून राजकारण या त्रिसूत्रांमुळे सातारा जिल्हा पुन्हा धगधगु लागला.
कराडातील पैलवान संजय पाटील खून, फलटणमधील कानिफ घोलप खून प्रकरणांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा बाळसे धरले. सल्या चेप्यासारख्या काही टिनपाट गुन्हेगारांचा सातारच्या गुन्हेगारी पटलावर उदय झाला. अशातच प्रतापसिंह नगर या झोपडपट्टी सदृश्य वसाहतीत मालीक उर्फ दत्ता जाधवचाही उदय झाला होता. एकूणच सातार्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले. तत्कालीन एसपी आणि अप्पर एसपी गुन्हेगारांबरोबरच स्कॉच मद्याचे प्याले रिचवू लागल्यामुळे एमआयडीसीतील बंद पडलेली फतेजा कंपनी दिवसाढवळ्या ट्रक लावून लुटली गेली. भंगारातून आणि वाळूतून मिळणार्या पैशामुळे गुन्हेगार बेफाम झाले. त्यामध्ये राजकीय पुढार्यांनीही अशांना अभय दिल्यामुळे सातार्यात खरेच कायद्याचे राज्य आहे काय, असा सवालही माध्यमांसह सर्वसामान्यांनाही पडलेला होता. परंतू मस्ती फार काळ चालत नाही. तत्कालीन पोलीस अधीक्षक के एमएम प्रसन्ना यांनी जिल्हा पोलीस दलाचा कारभार हातात घेतल्यानंतर मोक्का आणि तत्सम आयुधांचा वापर करुन जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांना जेरीस आणले. त्यानंतर आलेल्या डॉ. अभिनव देशमुख व संदीप पाटील यांनी गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारांवर मोक्कास्त्र डागून सातारा जिल्ह्यात खर्या अर्थाने कायद्याचे राज्य आणले. अनेक मी-मी म्हणणार्या डॉन आणि भाईंना जेलचे वासे मोजायला लावून अती केल्यावर त्याची माती होते, हे दाखवून दिले.
नव्वद च्या दशकात मुंबई व उपनगरात अंडरवर्ल्ड गुन्हेगारीने उच्छाद मांडलेला होता. रक्ताचे पाट वाहत होते. परंतू राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी पोलिसांना विशेष अधिकार मिळण्यासाठी जिवाचे रान केले होते. चड्डीतील पोलीस पँटीत आले. पोलिसांना जे अधिकार हवेत, ते महसुलातील लोकांना होते. कायदा व सुव्यवस्था पोलिसांनी राबवायची की, महसूल ने? हाही एक प्रश्न होता. फौजदाराच्या कंबरेला जरी रिव्हॉल्व्हर असले, तरी त्याचा खटका मात्र मामलेदाराच्या हातात असायचा. हा प्रघात इनामदारांनी मोडित काढला. पोलिसांना विशेष अधिकार मिळाले. यामुळेच मुंबई पोलिसांना मुंबई उपनगरातील संघटित गुन्हेगारी मोडित काढण्यास मदत मिळाली. कायद्याची अंमलबजावणी कितीही केली तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुन्हेगारी बोकाळतेच. अभिनव देशमुख, संदीप पाटील या जोडगोळीने अनुक्रमे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोक्का याचा सढळ हस्ते वापर केला. ज्यांना-ज्यांना खाज होती, असे गुंड-पूंड जेलात राहून सरळ झाले. चार-पाच वर्षे आतमध्ये राहिल्यानंतर खर्याअर्थाने बाहेरच्या जगाची किंमत कळते. केळाचा गाडा टाकेन, चणे-फुटाणे विकेन पण गुन्हेगारी सोडेन, असा शिरस्ता अनेक मी-मी म्हणणार्या नामचीन गुन्हेगारांनी पाळला आणि हे वास्तव आहे.
दोन वर्षापूर्वी देशात कोरोना या आगंतुक विषाणूने प्रवेश केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिकडेतिकडे हाहाकार माजला. या लाटेमध्ये आपण जातोय, की राहतोय, अशी दोलायमान परिस्थिती अनेकांची झाली. देशात आणि राज्यात जाहीर केलेल्या लॉक डाऊनमुळे बहुसंख्यकांना घरात बसावे लागले. जग जागच्या जागी थिजले. ज्यांना वाचनाची सवय नव्हती, त्यांना अवलोकनाची सवय झाली. जे टिव्ही कडे ढूंकून पाहत नव्हते, ते टिव्हीचे दिवाने झाले. नेटफ्लिक्स, प्राईम असे मोबाईल आणि टिव्हीवर दिसणारे मनोरंजनाचे प्लॅटफॉर्मही अनेकांना हवेहवेसे वाटू लागले. मिर्झापूर, भौकाल आणि तत्सम प्रकारच्या वेबसिरीज तरुणांनाही हव्याहव्याशा वाटू लागल्या अशा मालिकांमधून अर्थात वेबसिरीजमधून केले गेलेले गुन्हेगारीचे उदात्तीकरण तरुणांच्या आणि नवतरुणांच्या मनावर बिंबले गेले. कंबरेला खोचलेले पिस्तुल समोरच्यावर रोखून त्यातून झाडली गेलेली गोळी काही क्षणांत समोरच्याचा जीव घेते. मरणारालाही वेदना नाहीत आणि मारणारालाही संवेदना नाहीत. त्यामुळे मारणे सोपे आहे, जगणे अवघड आहे असा मॅसेज या वेबसिरीजच्या माध्यमातून तरुणांना मिळाला गेला. हे आणि असे तरुण आता सातारा जिल्हा आणि परिसरात गस्त घालू लागले आहेत. कंबरेला गावठी पिस्टल खोचले की, ऍटेक में भी गन, डिफेन्स में भी गन... हम बनायेंगे मिर्झापूर को अमेरिका... असे म्हणत सातार्यातील गुड्डू पंडीत सातार्यातील चौका-चौकात ठ्यांवऽऽ ठ्यांवऽऽ करु लागले. याची किंमतही सातारा शहराने जबर मोजली आहे.
गेल्या चार वर्षामध्ये सातारा शहरात आणि जिल्ह्यात गोळीबार आणि त्यातून पडणारे मुडदेही नित्याचे झाले आहेत. त्याची गणती न केलेलीच बरी. दि. 24 जानेवारी रोजी सातार्यातील एका युवकाचा वाढे फाटा परिसरात गोळ्या घालून अतिशय निघृण असा खून करण्यात आला होता. नंतर त्या खुनाची उकल झाली. आरोपींनाही अटक झाली. परंतू धक्कादायक बाब अशी की, या खुनामधील एक अल्पवयीन आरोपी हा याअगोदरच्या गुन्ह्यांमध्येही आरोपी होता आणि त्याने सातार्यातील एका पूर्वाश्रमीच्या नामचीन गुंडावर फायरिंग केली होती. या हल्ल्यामध्ये संबंधीत मरता-मरता वाचला होता. यातून बाहेर येवून संबंधित अल्पवयीनाने सुपारी घेवून थेट मर्डरच पाडला. कायद्यापुढे तो जरी अल्पवयीन अर्थात विधीसंघर्षग्रस्त बालक असला तरी अशा हैवानाला बालक म्हणायचे तरी कसे?
यापूर्वी सातारा शहरामध्ये दत्ता जाधव नामक गुंडाने उच्छाद मांडला होता. त्याच्या भानगडींमुळे पोलिसही जेरीस आले होते. त्याला वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. परंतू दत्ता आणि त्याची टोळी काही ताळ्यावर येत नव्हती. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी त्याला चांगलेच ताळ्यावर आणले. मोक्क्यातून सुटल्यानंतर दत्ताने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात असणार्या एका गावामध्ये रेड टाकायला गेलेल्या सातारा पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. यामध्ये पोलिसांसह महिला कर्मचारीही जखमी झाल्या होत्या. दत्ताच्या या दगडफेक कांडामुळे दत्ताचा काऊंटडाऊन सुरु झाला होता. कोणीतरी टिचकी दिली, दत्ता तुझा पोलीस एन्काऊंटर करणार आहेत. कैफात असणारा दत्ताही ताळ्यावर आला. भूमिगत राहिलो तर खरंच पोलीस आपला एन्काऊंटर करतील, या भीतीपोटी दत्ता नगरात आला. तत्कालीन परिवेक्षाधीन आयपीएस अधिकारी पवन बनसोड यांनी दत्ताच्या गचांडीला धरत त्याची प्रतापसिंह नगरातून पोवई नाक्यापर्यंत धिंड काढली होती. दत्ताची उरलीसुरलीही निघाली होती. दत्ताच्या पोकळ दहशतीला घाबरणारेही त्याच्यावर हसत होते. सध्या दत्ता आणि त्याची टोळी जेलचे वासे मोजत आहेत. एकूणच दत्ता नावाच्या दहशतीची सद्दी संपलेली आहे. पण चिल्ले-पिल्ले मात्र ऐकायला तयार नाहीत. कोयत्याच्या आणि पिस्तुलाच्या जिवावर सातार्यात पुन्हा दहशत माजवू पाहत आहेत.
उत्तर प्रदेशातील कानपुरातील विकास दुबे नामक एका गुंडाने जुलै 2020 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांवर गोळीबार करुन एका डीएसपी सह आठ पोलिसांना ठार केले होते. दुबे च्या या कांडामुळे भारतातील पोलीसदल हादरुन गेले होते. एकूणच विकास दुबे च्या या कांडामुळे भारतीय पोलिसांचे मनोबल खच्ची होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू युपी पोलिसांनीही कर्माची फळं स्वर्गात नाहीतर खालीच भोगावी लागतात, असे म्हणत दुबेला उज्जैनमधून ताब्यात घेत वाटेतच त्याचा एन्काऊंटर केला होता. एकूणच इन्स्टंट कर्मा काय असते, हे पोलिसांनीही दाखवून दिले होते.
विकास दुबे असो किंवा हैद्राबादेतील एका बलात्कार्याचा केलेला एन्काऊंटर असो. अशा घटना गुन्हेगारांना काही काळ धडकी भरवतात आणि पोलिसांचेही मनोबल वाढत असते. सातार्यातही या चिल्ल्या-पिल्ल्यांची दहशत वाढू लागली आहे. डीडी सिंगचा एन्काऊंटर केल्यानंतर गेल्या 17 वर्षात सातारा पोलिसांनी कोणाचाही एन्काऊंटर केल्याचे स्मरत नाही. हल्ली एन्काऊंटर झाल्यानंतर पोलीस कायद्याच्या कचाट्यात सापडतात. एन्काऊंटर वर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. जो-तो आपली खुर्ची आणि वर्दी वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये मानवाधिकारवाल्यांचे उपद्रवमूल्य जास्त असावे. परंतू एका गंभीर गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो मुडदे पाडत असेल आणि मुडदे पाडणे त्याला प्रतिष्ठेचे वाटत असेल तर अशांना दयामाया दाखवणे उचित नाही. सातारा भविष्यात शांत ठेवायचा असेल, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर गंजलेल्या बंदुकांना तेलपाणी करावेच लागेल. भलेही डीडी सिंग एन्काऊंटर ची पुनरावृत्ती करायची असेल तर समुपदेशन आणि मोक्क्याने काहीही हाशील होणार नाही. सातार्यातील चिल्ल्या-पिल्ल्यांची दहशत संपवायची असेल तर एखादा एन्काऊंटर तो बनता है बॉस...!
कोल्हापूर-पुणे जेलमध्ये फुटतात धुमारे...
--------------------------------
सातार्यात ब्रिटीशकालीन कारागृह आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी पाऊन शतकापूर्वी सातारचे जेल भेदले आणि ब्रिटीशांनी पुन्हा या जेलची उंची वाढवली. उंची वाढवली तरी जेलचे क्षेत्र तेवढेच राहिले. काळ बदलत गेला तशी गुन्हेगारीही बदलली. गुन्हेगारांची मोडस बदलली गेली आणि सातारचे जेल हाऊसफुल्ल झाले. या हाऊसफुल्ल नाट्यामुळे सातार्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील कच्च्या आरोपींना कोल्हापुरातील कळंबा आणि पुण्यातील येरवड्यात शिफ्ट केले जावू लागले. सातारची वेस न ओलांडलेले व गुन्हेगारीत मिसरुड न फुटलेले अनेकजण कळंब्यात आणि येरवड्यात नामचीन गुन्हेगारांचे शागिर्द झाले. येवू नको तर कुठल्या गाडीत बसू... असे म्हणत त्यांचे पाय चेपू लागले. याच हांजी-हांजी मधून त्यांनी पुणे-मुंबईच्या गुन्हेगारांची मोडस आत्मसात केली. एकूणच सातारच्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलले. त्या गुन्हेगारीला पुणे आणि मुंबईच्या गुन्हेगारीची झालर आली. भविष्यात सातार्यातील गुन्हेगारीची वैश्विकता टाळण्यासाठी सातार्यातील कच्च्या गुन्हेगारांना सातार्यातच ठेवले तर त्यांना पाय फुटणार नाहीत. पायातील चप्पल पायातच ठेवावी, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे सातार्यातील गुन्हेगारांचा पुणे-मुंबईतील गुन्हेगारांशी संपर्क येता कामा नये, याचीही दक्षता सातारा पोलिसांसह जेल प्रशासनाने घेतली पाहिजे.
- संग्राम निकाळजे.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |