04:40pm | Aug 21, 2018 |
सातारा : ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. फलटणमधील अवैध खासगी सावकारी प्रकरणात सावकारांच्या जिवावर गलेलठ्ठ झालेले काही ‘बायजी’ कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) यांच्या जिवावर उदार झाल्यामुळे फलटणमधील सावकारी अवैध खासगी सावकारी पीडितांमध्ये संभ्रमता निर्माण झाली आहे.
ज्या अवैध सावकारांनी फलटणकरांना सुमारे तीन दशके नाडले, अशा सावकारांना गेल्या वीस वर्षात पाठिशी घालून फलटणमधील दाढीवाल्या पुढार्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या. कफल्लक व रसातळाला गेलेले संस्थान सावकारांच्या जिवावर तारले. ते आता कायदा व सुव्यवस्थेची भाषा करु लागले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फलटणमधील विद्यमान नगरसेवक, एका विशिष्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करुन फलटणमधील अवैध खासगी सावकारीचे कंबरडे मोडले होते. अजूनही काही अवैध खासगी सावकार पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायट्या याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खासगी सावकारी करीत आहेत. फलटण तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या स्थावरजंगम मालमत्ता याच पिलावळींनी हजम केल्या आहेत. अवैध खासगी सावकारांना राजाश्रय द्यायचा आणि प्रकरण अंगाशी आल्यानंतर हात झटकायचे, हा फलटणमधील दाढीवाल्या पुढार्यांचा जुना उद्योग. नगरसेवक सनी अहिवळे, सोमवार पेठेतील संजय जाधव, धुळदेवमधील माजी सरपंच व्यंकट दडस, सस्तेवाडीतील विनायक चव्हाण, परवा नितीन चांडक या युवकाचे अपहरण करुन मारहाण करणारा युवराज पवार-पाटील हे कोणाचे बगलबच्चे व कार्यकर्ते, हे आता सांगायची गरज उरली नाहीये. परवा 18 ऑगस्ट रोजी होळ, ता. फलटण येथील उपसरपंच विनोद बबन भोसले यांनी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा फलटणमधील अवैध खासगी सावकारांनी डोके वरती काढलेले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांनी फलटणच्या गुन्हेगारीचे मूळ सावकारीच आहे, त्यामुळे सावकारीचे समूळ उच्चाटन केल्यानंतरच फलटणमधील गुन्हेगारी संपणार आहे, हे ताडले होते. त्यानुसारच या दोघांनीही ‘मास्टर प्लॅन’ तयार करुन फलटणमधील खासगी सावकारी चेपविण्याचे काम सुरु केले होते. संदीप पाटील यांनी तर भल्या-भल्या सावकारांना पाणी पाजले होते. मात्र, संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर फलटणमधील सोमवार पेठेतील अनेक अण्णा, दादा व शेठ लोकांनी फटाके वाजवून मिठाई वाटली होती. यावरुनच संदीप पाटील यांच्या कार्यशैलीचा अंदाज येवू शकतो. संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर फलटणमधील अवैध खासगी सावकारांनी पुन्हा एकदा डोके वरती काढले आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील एका उमद्या तरुणाचा बळी गेला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेहमीच सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. सामान्य व बहुजन समाजातील मुले राजकारणात आणली तरच हे स्वातंत्र्य टिकणार आहे, असे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे ठाम मत होते. त्यानुसार त्यांनी सातारा जिल्ह्यातील संस्थानिकांना ज्या-त्या ठिकाणी दाबून ठेवण्याचे काम केले होते. त्यानुसार फलटण तालुक्याचा विचार केल्यास माजी दिवंगत आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर, डॉ. कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम या तिनही आमदारांनी फलटणमध्ये खर्या अर्थाने लोकशाही रुजवली होती. परंतू 1995 सालानंतर फलटणमध्ये पुन्हा एकदा राजेशाही आली. संस्थानिकांचा थाट आणि बाट काय असतो, हे फलटणकर सध्या ‘याची देही, याची डोळा’ पाहत आणि अनुभवत आहेत. फलटणमध्ये समांतर अशी राजेशाही अवलंबली जात आहे. राज्यघटना येथील राज्यकर्त्यांनी तुळईला बांधली आहे. पूर्वी विनोबा भावे यांच्या भू दान चळवळीमध्ये फलटणमधील अनेकांना जमिनी मिळाल्या. या गोरगरीबांच्या जमिनी बळकावण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सुरु आहे. परंतू सर्वच सत्तास्थाने हातात असल्यामुळे येथील गरीब फलटणकर या दाढीवाल्या बाबांशी दोन हात करु शकत नाहीत, हे फार मोठे वास्तव आहे. मुक्या प्राण्यांनासुद्धा किती खावे व काय खावे, याबाबतचे ज्ञान असते. परंतू फलटणमधील दाढीवाल्या बाबांना किती खावे व काय खावे याचे भान राहिलेले नाही. अती खाण्याने अजीर्ण होते. एक ना एक दिवस हे खाल्लेले बाहेर पडणारच आहे. सद्दाम हुसेन व मोहम्मद गद्दाफीलाही त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली. त्यामुळे अमरत्व कोणीही घेवून आलेले नाही, याची जाण संबंधितांना असायला हवी. फलटणमधील गुंडगिरी, अवैध खासगी सावकारी, अवैध कत्तलखाने हे कोण चालवित आहे, हे फलटणकरांना व पर्यायाने सातारकरांना सांगायची गरज उरलेली नाहीये.
सुमारे दोन वर्षापूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटणमध्ये आले होते. अधिकार्यांवर राजेशाही भुरळ घालण्यात फलटणचे दाढीवाले बाबा पटाईत आहेत. भंगारातल्या गाड्या गोळा करुन ‘ही गाडी अमुक चित्रपटातील, ती गाडी तमुक चित्रपटातील’ अशा पुड्या सोडायच्या, हा या दाढीवाल्यांचा एककलमी कार्यक्रम. खोटे बोल, पण रेटून बोल ही मोडस ऑपरेंडी चक्क पोलीस अधिकार्यांवरच वापरायची, घरातल्या राजेशाही सोफ्यावर बसून पोलीस अधिकार्यांसमवेत फोटोसेशन करायचे आणि ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करायचे, ही दाढीवाल्या बाबांची जुनी रित. तेच फोटो मग फलटणमधील दाढीवाले बाबा भक्त ढकल पुढे, असे म्हणत सोशल मिडियावर व्हायरल करतात. त्यामुळे सामान्य फलटणकर दाढीवाल्या बाबांच्या महसुल आणि पोलिसांच्या कनेक्शनमुळे त्यांच्याविरोधात अथवा त्यांच्या पिलावळीविरोधात तक्रार द्यायला धजावत नाही. कब्जी, पापी, लबाड आणि धूर्त हे सर्व गुणसंपन्न असलेल्या चोराच्या उलट्या बोंबा सध्या फलटणमध्ये सुरु आहेत. सुमारे तीन वर्षापूर्वी ‘सातारा टुडे’ने प्रथम फलटणच्या अवैध खासगी सावकारांवर प्रहार केलेला होता. त्यामुळे फलटणच्या राजवाड्याच्या भींतीही हादरल्या होत्या. इन्कम सोर्स बंद झाल्यामुळे अनेक दाढीवाले बाबा कोमात गेले होते. फलटण नरेशांकडे ‘त्राहीमाम... त्राहीमाम’ असा आर्जव केला होता. त्यामुळे फलटण नरेशांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावून फलटणमधील अवैध खासगी सावकारी वाचविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे फलटण नरेशांना पुरुन उरले. कोणताही मुलाहिजा न ठेवता संदीप पाटलांनी आपले काम चोख असते, हे फलटण नरेशांना दाखवून दिले होते. यानंतर काही दाढीवाल्या बाबांना उपरती झाली की, पॉकेटमनीसाठी फलटणमधील मार्केट यार्डात अवैध खासगी सावकारी निर्मूलनाचे दुकान सुरु केले. या दुकानात अवैध खासगी सावकारांकडूनच तोड्या-माड्या होवू लागल्या. त्यामुळे मूळ तक्रारदारालाच आत्महत्त्या करण्याची वेळ येवून ठेपली.
केद्र व राज्य शासन देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी देशातील पोलीस दलांवर अरबो रुपये खर्च करीत आहे. आज पोलिसांमुळेच देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. कोणी टिनपाट उठतो, आणि आपले पाप झाकण्यासाठी सेटलमेंटचे दुकान उघडतो, ‘यह बात कुछ हजम नहीं हुई.’ फलटणमधील अवैध खासगी सावकारांचे दलाल बनून काहीजण उलट्या बोंबा ठोकताहेत. परंतू फलटणकर व पर्यायाने पोलीसही वेडे नाहीत. फलटणमधील अनेक भानगडी लोकांना आता समजू लागल्या आहेत. त्यामुळे ‘आयजीच्या जिवावर बायजी होणार्या प्रवृत्ती’ पोलिसांनीच आता खड्यासारख्या बाजुला केल्या पाहिजेत. फलटणमधील लोकांसाठी कायद्याचे राज्य आणण्यासाठी पोलिसांनाच आता त्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. तरच आणि तरच फलटणमध्ये कायद्याचे राज्य निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.
- संग्राम निकाळजे.
पोलीस अधीक्षकांच्या नावानेही चक्क सेटलमेंट?
तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्युअर पोलिसिंगचा अनुभव जिल्ह्यातील लोकांना दिला. गुंडपूंड झोडपून काढले, सावकारांच्या गठड्या आवळल्या. सातारा जिल्हा कधी नव्हे असा शांत झाला. राज्यात कार्यरत असणार्या अनेक बड्या पोलीस अधिकार्यांनी सातारा जिल्ह्यात चांगले पोलिसिंग केले. शांत, संयमी वाटणारा जिल्हा कराड, सातारा, फलटणच्या गुन्हेगारी कारवायांमुळे धगधगू लागला होता. परंतू या तिनही अधिकार्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून राज्यात ओळखले जातात. नुकतीच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. परंतू फलटणमधील काही दाढीवाले बाबा त्यांच्याशी नातेसंबंध असल्याचा दावा करताहेत, त्यांना फलटणमधील सेटलमेंटच्या दुकानाला भेट देण्याचे आवतनही दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे फलटणकरांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. राज्यघटनेच्या परिच्छेद 19 मध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे कोणी, कोणाला भेटावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतू अशा चर्चांमुळे सावकारी पीडितांमध्ये मात्र भीती निर्माण झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |