08:19pm | Jun 20, 2018 |
सातारा : खाजगी फायनान्स कंपन्यांच्या जाचाला कंटाळून पनवेल (नवी मुंबई) येथील तरुणाने 31 मे रोजी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, काल सकाळी येथील लोणंद रस्त्यावर वाढे फाट्यानजीक एका फायनान्स कंपनीच्या अनाधिकृत हप्ता वसुली करणार्या गुंडांनी फायनान्स कंपनीची कर्ज असलेली गाडी अडवून त्या गाडीत बसलेल्या कुटूंबाला मारहाण करीत, गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, संबंधित कंपनीच्या हप्ता वसुली करणार्या गुंडांनी त्या कार चालकाकडून 12 हजार रुपयांच्या हप्त्याच्या बदल्यात सुमारे 50 हजारांची तोड केली. काल घडलेल्या या प्रकारामुळे मात्र सातारा शहरात या हप्तेखोरांविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दुचाकी, चारचाकी, घर आदींसह मोबाईल व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करावयाच्या असल्यास पूर्वी राष्ट्रीय, सहकारी बँका व पतपेढ्या आर्थिक पतपुरवठा करत असत. मात्र, या बँकांच्या व पतपेढ्यांच्या जाचक अटींमुळे ग्राहक त्रासून जायचा. याचाच फायदा घेवून अनेक मोठ-मोठ्या गुंतवणूकधारकांनी खाजगी पतपुरवठा कंपन्या स्थापन करुन ‘फायनान्स’ हा फंडा बाजारात आणला. हजार रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत या फायनान्स कंपन्या ग्राहकांना वित्त पुरवठा करु लागल्या. ज्याची ऐपत नसेल, अशा लोकांनाही फायनान्स कंपन्यांनी भुरळ घातली. ज्यांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पतपुरवठा नाकारला, अशांना फायनान्स कंपन्यांचा आधार मिळतो. एक चतुर्थांश रक्कम भरल्यानंतर बाकी राहिलेली रकमेचा पतपुरवठा संबंधित फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून केला जातो. फायनान्स कंपन्याकडून संबंधित ग्राहकांकडून तारण म्हणून सही केलेले कोरे धनादेश, जमिनीचे सातबारे, जामीनदार व्यक्ती, आदी घेतले जातात. तसेच ज्या माणसाला इंग्रजी कळत नाही वा वाचताही येत नाही अशा व्यक्तींकडून इंग्रजी दस्तावेजावर सह्या घेतल्या जातात. या अगोदर या ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला असतो. आपण नक्की कोणत्या कागदपत्रावर सही करतोय हे त्या बापड्या व्यक्तीला कल्पनाही नसते. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा संबंधित फायनान्स कंपन्यांकडून घेतला जातो. आवळ्याच्या बदल्यात कोहळा ही म्हण वापरुन त्या व्यक्तीच्या असहाय्यतेचा फायदा उचलून या कंपन्या स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.
या फायनान्स व विमा कंपन्यांवर आयआरडीए व सेबी (सिक्युरीटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) या केंद्र सरकारच्या देशातील भांडवल बाजारांचे नियंत्रण करणार्या मध्यवर्ती यंत्रणा या फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवून असतात. मात्र मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवणूकदारांकडून या फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवला जातो व संबंधित गुंतवणूकदारांना फायनान्स कंपन्या काळ्याचे पांढरे करुन परतावा देत असल्यामुळे या फायनान्स कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. याच आधारावर फायनान्स देण्यासाठी फायनान्स कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु झालेली आहे. त्यामुळे बँकांनी नाकारलेल्या अनेकांना खाजगी फायनान्स कंपन्यांचाच आधार वाटतो. एखादी वस्तू खरेदी करण्या अगोदर त्या वस्तूमध्ये ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या अडकलेली असते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा या कंपन्या उचलत असतात. प्रत्यक्षात सांगितलेला आणि लावलेला वेगळा व्याजदरामुळे माणूस पुरता गांगरुन गेलेला असतो. परंतू वेगवेगळ्या नियम व अटी असणार्या कागदपत्रांवर सह्या केल्या असल्यामुळे तो संबंधित कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असतो. दगडाखाली हात सापडल्यानंतर भल्याभल्यांची मती गुंग होते, तद्वतच फायनान्स कंपन्यांचे तो काहीच करु शकत नाही.
आर्थिक व घरगुती कारणावरुन फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा एखादा हप्ता तो भरु शकत नाही, नेमके याच गोष्टीचा फायदा फायनान्स कंपन्याकडून उचलला जातो. चुकलेल्या हप्त्यावर भरमसाठ पेनल्टी आकारली जाते. परिणामी तो माणूस दर महिन्याला फायनान्स कंपन्यांच्या 'पठाणी' व्याजाच्या चक्रव्युहात अडकला जातो. यानंतर खर्या अर्थाने सुरु होतो तो फायनान्स कंपन्यांच्या अनाधिकृत गुंडांचा ससेमिरा. कोणतेही अधिकार नसताना फायनान्स कंपन्याकडून नियुक्त केलेल्या एजन्सीचे गुंड थकीत कर्ज असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून कारवाईचा दंडुका उगारुन व दंडेलशाही करुन कर्जाच्या हप्त्याच्या चारपट पैसे उकळून खंडणी गोळा केली जात आहे. एखाद्या वाहनामध्ये महिला व लहान मुले असल्यासही त्या कर्जदारावर दबाव टाकण्यासाठी त्या महिला व लहान मुलांवर धक्काबुक्की केल्याच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक फायनान्स कंपन्यांना रितसर व न्याय मार्गाने कर्जवसुली करावयाची असते. परंतू झटपट पैसे गोळा करण्यासाठी व गुंतवणूकदारांचे पैसे ‘साभार’ परत देण्यासाठी त्यांना अशा गुंडापुंडांची गरज असते.
शहरातील अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी नामचीन गुन्हेगारांना वसुलीच्या एजन्सी दिलेल्या आहेत. याला कोणतीही बँक अथवा फायनान्स क्षेत्रातील तसेच मध्यवर्ती संस्थेची परवानगी नसतानाही संबंधित फायनान्स कंपन्यांच्या शाखा व्यवस्थापनाने अशा गुंडापुंडांना वसुलीच्या एजन्स्या दिल्या आहेत. या एजन्सीमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांचा भरणा केलेला दिसून येत आहे. हे युवक प्रत्येक चौका-चौकात व राष्ट्रीय महामार्गावर कागदाचे भेंडोळे घेवून उभे दिसते. या कागदाच्या भेंडोळ्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या क्रमांकाचा भरणा असतो. एखाद्या गाडीचे एक-दोन हप्ते थकले तरी संबंधितांकडून कोणताही मुलाहिजा न बाळगता संबंधित गाडी अडवून वाहनचालकाला शिवीगाळ व प्रसंगी मारहाण करुन कायदा हातात घेतला जातो. यावेळी संबंधिताकडे त्या फायनान्स कंपनीचे साधे ओळखपत्रही नसते. त्यामुळे संबंधित गाडी चालकाला समोरच्याची ओळख पटविणे कठीण होवून बसते. अशावेळी गाडी ताब्यात द्या. अन्यथा बाकी असलेल्या कर्जाच्या हप्त्यासह आमचीही फी द्यावी लागेल, अशी दटावणी केली जाते. परंतू हप्त्यावरील व्याज व संबंधित एजन्सीच्या गुंडांनी मागितलेली रक्कम अव्वाच्या सव्वा असते. त्यामुळे संबंधित वाहनचालक हतबल होतो. याच गोष्टीचा फायदा फायनान्स कंपनीचे गुंड उचलतात. भर रस्त्यात वाहनचालकासह त्या कुटूंबाला गाडीतून उतरवले जाते व गाडी ताब्यात घेतात. परंतू त्या चालकाला पुन्हा कधीच ती गाडी त्या वाहन मालकाला परत दिली जात नाही. म्हणजेच गाडीही गेली आणि भरलेले एक चतुर्थांश पैसेही गेले, अशी अवस्था सध्या फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची केली जात आहे. वास्तविक हे सर्व बेकायदेशीर आहे. ही एकप्रकारे अवैध खाजगी सावकारीच आहे. फायनान्स या गोंडस नावाखाली जिल्ह्यातील लोकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणाही जास्त लक्ष घालत नसल्यामुळे या फायनान्स कंपन्या व त्यांनी पोसलेल्या गुंडांचे फावलेले आहे. अशा कंपन्यांवर जिल्हा पोलीस यंत्रणेने कारवाई न केल्यास या फायनान्स कंपन्यांच्या विरोधात हातात 'दंडुका' घेवून त्यांना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल निंबाळकर व धीरज पाटोळे यांनी दिला आहे.
मोझरांच्या 'फायनान्स' आंदोलनाचे पुढे काय ?
जिल्ह्यात मायक्रो फायनान्सच्या नावाखाली खाजगी व अवैध फायनान्स कंपन्यांनी धुडगूस घातलेला आहे. या फायनान्स कंपन्यांकडून जिल्ह्यातील महिला व बचतगटांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जात आहे. याबाबत आलेल्या अनेक तक्रारीनंतरही जिल्हा प्रशासनाने या आर्थिक फसवणुकीबाबत दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन उपनेते संदीप मोझर यांनी या बोगस फायनान्स कंपन्यांविरोधात एल्गार पुकारलेला होता. याबाबत संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखालील हजारो महिलांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर वेळोवेळी धडक मोर्चाही काढला होता. परंतू परजिल्ह्यातील एका 'उपर्या' मंत्र्याने या बोगस फायनान्स कंपन्यांशी आर्थिक तडजोडी करुन या आंदोलनातील हवा काढून घेतली होती. त्यानंतर या आंदोलाचे पुढे झाले काय ? असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक पिडित महिला व बचतगट जिल्हा प्रशासनाला करु लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |