01:46am | Apr 01, 2020 |
सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असे लॉक डाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर काहीजण अनुमानित म्हणून होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत. असे असताना घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याला पाठवून तेथून जिल्ह्यातील अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट पाठविला जात असल्यामुळे हे काम अतीशय वेळखावू असल्यामुळे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड येथे स्वॅब टेस्टिंग लॅब उभी करण्याची मागणी केलेली आहे.
कराड हे तालुक्याचे ठिकाण आहे, तर सातारा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. स्वॅब टेस्टिंग लॅब कराडात हवी, की सातार्यात? हे जिल्ह्यातील शेंबडं पोरगंही सांगू शकेल. परंतू खासदारांना आपण सातारचे की कराडचे खासदार आहोत, यातील फरकही कळत नसल्यामुळे जिल्हाभरात प्रक्षुब्धतेचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. पर्यायाने जिल्ह्यात पुन्हा लोकसभेची निवडणूक लागली. अतीशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांना ऐन वार्धक्यात खासदारकीची लॉटरी लागली. यापूर्वी 1999 ते 2009 पर्यंत त्यांनी दोनदा कराड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. परंतू 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत पाटलांचा हक्काचा कराड लोकसभा मतदारसंघ विसर्जित झाला. पर्यायाने काही काळ पाटलांना राजकीय विजनवासात जावे लागले. परंतू काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पावसात झालेली ती सभा पथ्यावर पडली आणि पाटलांच्या गळ्यात अलगदपणे खासदारकीची माळ पडली. मात्र, गेल्या काही महिन्यात कराड ते मारुल हवेली, मारुल हवेली ते पुणे असाच त्यांचा प्रवास राहिला. आपण कराडचेच नाहीतर, सातारा जिल्ह्याचे खासदार आहोत, असा कधीकधी त्यांना विसर पडतो. कदाचित हा वयोमानाचा परिणाम असू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये खासदारांनी दखल घेण्याजोगी केलेली कोणतीही गोष्ट आठवत नाही. असो, परंतू सध्या पूर्ण जगभरात आणि पर्यायाने सातार्यातही कोरोना (कोविड-19) विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाला मात देण्यासाठी आपल्यापरिने पावले उचलली आहेत. मात्र, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढारी कोरोनाच्या अनुषंगाने होम क्वारंटाईन झालेले आहेत. त्यांना मतं देणार्या मतदात्यांबद्दलही ते अनास्था दाखवित आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे दोन रुग्ण मिळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कठोर पावले उचलून त्याबाबतची अंमलबजावणीही करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुमानित रुग्णांची चाचणी करण्यासाठी त्या अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे सॅम्पल्स पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात येतात व तेथून यासंदर्भातील चाचणीचा रिपोर्ट पाठविला जातो. ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्यामुळे सातार्यातील सर्वसाधारण रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरु करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वी झालेली आहे. असे असताना सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा हे जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही तसेच जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील उपजिल्हा रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयाशी संलग्न आहेत. असे असतानाही कराड येथील एका खाजगी रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब उभारण्याचा घाट घातलेला आहे. वास्तविक सातारा जिल्हा हा दुर्गम जिल्हा आहे. म्हसवडपासून सातारा शहरापर्यंत पोहोचण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. जावली तालुक्यातील कांदाटी खोर्यातून एखादा रुग्ण सातार्यातील सर्वसाधारण रुग्णालयात पोहोचण्यासाठी एक दिवस लागतो. असे असतानाही सातारा शहर हे मध्यवर्ती आहे. फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, पाटण, माण-खटाव हे थोड्या अधिक प्रमाणात अंतराच्या बाबतीत सातारच्या जवळ पडतात. असे असतानाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वॅब टेस्टिंग लॅबचा घाट कराडातच का घातला? याबाबत अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. कराडच्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी सातारा शहर भकास केले. सातार्यातून जेवढे ओरबाडता येईल, तेवढे ओरबाडले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत सातारा शासकीय रुग्णालयात असलेले सिटी स्कॅन मशीन एका रात्रीत भिंत तोडून कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये पळवले होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या पळवापळवीचा जबर फटका जिल्ह्यातील इतर तालुक्यातील गोरगरीब जनतेला बसला होता. एका सिटी स्कॅनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना हजारो रुपये खर्च करावे लागत होते. सुमारे चार ते पाच वर्षे हक्काचे सिटी स्कॅन मशीन पळवल्यामुळे कोट्यवधींचा फटका जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला बसला होता. जिल्ह्यातील मुख्यमंत्री झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सातार्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तडीस नेतील, असा कयास होता. परंतू कसले काय, कराडपेक्षा सातारा शहर मोठे व विकसित नाही झाले पाहिजे, या कोत्या मनोवृत्तीमुळे चव्हाणांनी आपल्या कारकीर्दीमध्ये सातारचे शासकीय महाविद्यालय होऊ दिले नाही. आजच्या घडीला
शासकीय महाविद्यालय उभे राहिले असते तर सध्या सुरु असलेला कोरोनाचा संसर्ग मोठ्या ताकदीने परतवून लावता आला असता. परंतू कराडच्या राज्यकर्त्यांनी सातारकरांच्या बाबतीत नेहमीच बोटचेपे धोरण अवलंबले. त्याचा फटका सातारा शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही बसलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात एक दिवसाआड अनुमानित रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात येत आहेत. परंतू यासाठी संपूर्ण दिवस खर्ची पडत आहे. सातार्यातच स्वॅब टेस्टिंग लॅब उभी केल्यास लागणारा हा वेळही वाचणार आहे. तसेच वैद्यकीय यंत्रणेवर पडणारा ताणही कमी होणार आहे. केंद्र शासन कोरोनाची सॅम्पल तपासणी काही तासांवर नाहीतर काही मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असताना सातार्यात स्वॅब टेस्टिंग लॅब करायची सोडून खासदार पाटलांनी हीच लॅब कराडात नेण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्च चे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव यांच्याशीही त्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. एवढेच काय, शासकीय प्रोटोकॉल तोडून त्यांनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना यासंदर्भात वाकडी वाट करायला लावून त्यांच्या निवासस्थानी बोलावून कराड येथे स्वॅब टेस्टिंग लॅब उभारण्याची विनंती केली होती. दोन दिवसांत ही लॅब उभे करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी खासदारांना दिले. वास्तविक पाटलांनी कराडबरोबरच सातार्यात ही स्वॅब टेस्टिंग लॅब उभी करण्यासंदर्भात निर्देश दिले असते तर याचा फायदा कराडपुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्याला झाला असता. परंतू कराडकर पुढार्यांनी उर्वरित सातारा जिल्ह्याला व विशेषत: सातारा शहराला सापत्नभावाची वागणूक दिलेली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कराडकर पुढार्यांनी पुन्हा एकदा आपल्या नीच मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. किमान अशा आणीबाणीच्या काळात तरी जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अशापद्धतीचे राजकारण करायला नको होते. येणारा काळ हा धामधुमीचा आहे. त्यामुळे खासदारांनी आपली शक्ती केवळ कराडपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्याच्या विकासासाठी खर्ची घालावी. तरच कराडसह जिल्ह्यातील इतर नागरिकांनी त्यांना केलेल्या मतदानाचे चीज होणार आहे.
जिल्ह्यातील हायड्रॉक्सिक्लोरिक्विन चा साठा गेला कुठे?
हायड्रॉक्सिक्लोरिक्विन या औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो, असा दावा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष नमन गंगाखेडकर यांनी केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक मेडिकल्समधील या औषधाचा साठा आश्चर्यजनकरित्या गायब झाला. याबाबत सातारा टुडे ने वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांनी खुलासा करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली होती. मात्र, दोन दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे जिल्ह्याचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारुन खुलासा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |