सातारा : सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस उत्पादन घेतले असून,साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला अद्याप मिळत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांचा आर्थिक फायदा न पाहता वाढलेल्या साखर दराच्ग योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केले आहे.
साखरेचे दर गगनाला भिडले असताना जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता जाहीर करण्याबाबत पुढाकार घेतलेला नाही.ही बाब अत्यंत गंभीर आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे,मजुरी, वाहतूक,सिंचन व इतर उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर मात्र त्या तुलनेत अपुरा आहे.त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर साखरेच्या वाढलेल्या दराचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दुसरा हप्ता जाहीर करावा, शेतकऱ्यांना दुसरा हप्ता वेळेत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कारखानदारांना आवश्यक्य सूचना द्याव्यात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व बाजारातील परिस्थितीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.
हा प्रश्न सातत्याने लावून धरला जाणार असून प्रशासनाने या मागणीचे गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, अमर कदम, सचिन नलावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.