सातारा : खंडाळा आणि किसनवीर या दोन साखर कारखान्यांच्या अनुषंगाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही कारखान्यांच्या भागीदारी करारास मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. हा करार वाढल्यास दोन्ही कारखाने लवकरच कर्जमुक्त होतील, असा विश्वास ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर या विषयावर पुढील कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. कारखान्यांच्या कामकाजासह सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला. दोन्ही कारखान्यांशी संबंधित प्रश्न मार्गी लावताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
भागीदारी करारास मुदतवाढ मिळाल्यास त्याचा कारखान्यांच्या पुढील कामकाजावर तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांवर परिणाम होणार असल्याने या निर्णयाकडे शेतकरी व सभासदांचे लक्ष लागले आहे.