मुंबई पोलिसांच्या अश्वदलाला गृह विभागाकडून निधीचे ‘बळ’; अत्याधुनिक सुविधांसह आणखी घोडे ताफ्यात येणार

by Team Satara Today | published on : 25 August 2026


मुंबई: गुन्हेगारांना पकडण्यासाठी एकीकडे मुंबई पोलिसांना अत्याधुनिक वाहने सरकारच्या गृह विभागाकडून दिली जात असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या अश्वदलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृह विभागाने १ कोटी २७ लाख १० हजार ५८१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन घोड्यांची खरेदी, घोडेस्वारीचे साहित्य, पशुवैद्यकीय तपासणी व उपचार आणि प्रशिक्षकांचे मानधन यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. या निधीमुळे अश्वदलाचा विस्तार करण्याबरोबरच घोड्यांच्या देखभालीसाठी उपलब्ध सुविधा आणखी उपलब्ध होणार आहेत.

मरोळ पोलीस कॅम्पमध्ये मुंबई पोलिसांच्या अश्वदलासाठी आधुनिक तबेला उभारण्यात आला आहे. सध्या येथे २२ घोडे आहेत. पूर्वी घोड्यांची संख्या कमी होती. वर्षभरात अश्वदलात २० घोड्यांची भर पडली आहे. परेड, मिरवणूक बंदोबस्त, समुद्रकिनाऱ्यावरील गस्त आणि गर्दीच्या ठिकाणी या घोड्यांचा वापर केला जात आहे. २०२३ मध्ये मरोळमध्ये नवीन तबेला २०२३ मध्ये उभारण्यात आला. यापूर्वी घोडे याच परिसरातील तात्पुरत्या तबेल्यात ठेवले जात होते.

दरम्यान, मंजूर रकमेतून नवीन घोडे, सॅडलरी व घोडेस्वारीचे साहित्य, पशुवैद्यकीय तपासणी व उपचार आणि प्रशिक्षकांचे मानधन यासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा खर्च २०२६-२७च्या मुंबई शहर पोलिस आस्थापना बजेटमधून करण्यात येणार आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर गस्त वाढविणार

गिरगाव, जुहू, अक्सा, दाना पानी, गोराई आणि उत्तन या समुद्रकिनाऱ्यांवर अश्वदलाच्या माध्यमातून गस्त वाढविण्याची योजना आहे. वाहनांना पोहोचणे अवघड असलेल्या भागात घोड्यावरून गस्त घालणे पोलिसांसाठी उपयुक्त ठरते. गर्दीच्या ठिकाणी घोड्यावर बसलेला पोलिस कर्मचारी उंचीवरून मोठ्या परिसरावर लक्ष ठेवू शकतो. मरोळ पोलीस कॅम्पमधील अश्वदलाचा परिसर २.९६ एकरांवर विकसित करण्यात आला आहे. येथे ३६ स्टेबल, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय व्यवस्था, स्विमिंग पूल वघोड्यांच्या विश्रांतीची सोय आहे. घोड्यांची प्रशिक्षणासाठी ५०हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी आहेत. घोड्यांना रुग्णालयात नेण्यासाठी चार रुग्णवाहिकांचीही व्यवस्था आहे.

मुंबई पोलिसांचे अश्वदल १९३२ मध्ये बंद करण्यात आले होते. मोटार वाहनांचा वापर वाढल्याने घोडदळाची गरज नसल्याचे त्यावेळी मानले गेले. तब्बल ८८ वर्षांनंतर २०२०मध्ये अश्वदल पुन्हा कार्यरत करण्यात आले. सुरुवातीला १३ घोड्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आता अश्वदलाला बळकटी देण्याचे काम केले जात आहे. अश्वदलातील घोड्यांना गर्दी, आवाज, विविध प्रकारचे रस्ते आणि पाण्यातून चालण्याची सवय लावली जाते. सध्याच्या घोड्यांना उडी मारणे, धावणे, घोडेस्वारी आणि पोलिसांच्या कामासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राजस्थान, हरियाणा, केरळ आणि पुणे येथून घोडे आणण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा राज्यातील अडीच लाख महिलांना लाभ; गर्भवती आणि नवजात बालकांच्या आरोग्याला आर्थिक बळ देण्यासाठी योजना

संबंधित बातम्या