मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ८६,६६२ कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. काम पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने कंत्राटदार संतप्त झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार कंत्राटदार महासंघाच्या बॅनरखाली १८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरहून मोठ्या संख्येने कंत्राटदार सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.
नागपूर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी सांगितले की, प्रलंबित बिलांच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटदार अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत पैसे देण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता महासंघाच्या बॅनरखाली मुंबईत आंदोलन होणार आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, संबंधित विभागांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीची मागणी महासंघाने केली आहे. बिलांचे पैसे न मिळाल्याने कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकेचे हप्ते आणि व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च भागविण्याचा प्रश्न उभा आहे.