सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधारेमुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवार) सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. सांडव्यावरून १९ हजार ५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. पायथा विद्युतगृहातून सुरू असलेल्या १ हजार ५० क्युसेक विसर्गासह नदीपात्रात २० हजार ५८५ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी २१५७ फूट सहा इंच (६५७.६०६ मीटर) झाली होती. धरणात ९७.५० टीएमसी (९२.६४ टक्के) एकूण, तर ९२.३८ टीएमसी (९२.२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या १८ हजार ९६३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. सकाळी आठपर्यंत कोयना येथे दिवसभरात २८, नवजा येथे ४५, तर महाबळेश्वर येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत कोयना येथे ३७१५, नवजा येथे ४६६९ आणि महाबळेश्वर येथे ४८७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.