पंतप्रधान मोदींनी ठाकरे गटातून आलेल्या शिवसेनेच्या खासदारांशी साधला संवाद; प्रत्येक खासदाराच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे आश्वासन

by Team Satara Today | published on : 08 August 2026


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील राज्यसभेतील नवनिर्वाचित आणि लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये नव्याने सामील झालेले खासदार उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांचादेखील सहभाग होता. ठाकरे गटातून आलेल्या खासदारांनी काही काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक खासदाराच्या पाठीशी खंबीर असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे समजते. यावेळी खासदारांना आरोग्यविषयक सल्लादेखील पंतप्रधानांनी दिला.

‘एनडीए’च्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी खास अल्पोपाहाराचे आयोजन केले होते. या संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह शिवसेना आणि ‘एनडीए’चे सर्व नवनिर्वाचित खासदार, तसेच तृणमूल काँग्रेस पक्षातून ‘एनसीपीआय’सोबत गेलेले लोकसभेतील खासदार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांशी मराठीत संवाद साधला, असे सूत्रांनी सांगितले. ‘एनडीए’ हा एक परिवार आहे. एक खासदार असो किंवा १५० असो, प्रत्येक घटकपक्षाला समान सन्मान मिळणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी खासदारांना दिले. प्रत्येक घटकपक्षाच्या पाठीशी खंबीर असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

‘...तर थेट ‘पीएमओ’शी बोला’

पंतप्रधान मोदींनी शिवसेनेच्या सर्व खासदारांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. मतदारसंघांमधील विकासाला गती देण्यासाठी सरकारच्या संसाधनांचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन त्यांनी खासदारांना केले. विकासकामे राबवताना काही अडचणी आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी (पीएमओ) संपर्क साधावा, असा सल्ला पंतप्रधानांनी खासदारांना दिला असल्याचे सूत्र म्हणाले. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघाबद्दल आणि तिथे सुरू असलेल्या कामांबद्दल वैयक्तिकरीत्या विचारणा केली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीट पेपरफुटीचे कारस्थान काही महिन्यांपूर्वी रचले होते, एनटीएचे तज्ञ पेपर तयार करताना प्रश्न लक्षात ठेवायचे - केंद्रीय अन्वेषण विभागाचा दावा
पुढील बातमी
भारतात १३ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी?; संसदेत खासगी विधेयक आणण्याची तयारी

संबंधित बातम्या