मुंबई : राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर तसेच संतृप्त किंवा ट्रान्स फॅट (HFSS) असलेल्या पदार्थांच्या विक्री, जाहिरात आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शाळांच्या आवारात व परिसरात वडापाव, समोसा, केक, पेस्ट्री, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, पाकीटबंद चिप्स, कोल्ड्रिंक्स व अन्य जंकफूडची विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कँटीन, पुरवठादार किंवा विक्रेत्यांवर सुधारणा सूचना, दंड, ‘एफएसएसएआय’ परवाना निलंबित किंवा रद्द करणे, तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी तसेच राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांच्या संलग्न शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड, फूड सेफ्टी सुपरवायझर, तसेच हेल्थ अँड वेलनेस ॲम्बेसेडर किंवा समकक्ष अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय, वर्षातून किमान दोनवेळा अन्न सुरक्षा तपासणी आणि किमान एक अन्न नमुना संकलित करण्याचे निर्देशही दिले आहेत.