मुंबई : "देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिलं आहे. अंधभक्तांविरोधात अखेर देशभक्त जिंकले असून, आता देशात 'भाजप विरुद्ध भारत' अशा मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली आहे," अशा शब्दांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शिवाजी पार्क येथील जल्लोष मेळाव्यात ते बोलत होते. देशातील तरुण आंदोलकांनी (जेन झी) सरकारच्या झिंंज्या कशा उपटतात, हेच या आंदोलनातून दाखवून दिले आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
२१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानिमित्त ठाकरे बंधूंनी मुंबईत जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याच्या सुरुवातीला 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निराश होऊन जीवन संपवलेल्या २१ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. तसेच सर्वांना एक मिनिटांचे मौन बाळगून २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर "ज्या विद्यार्थ्यांनी या अन्यायामुळे आपले जीवन संपवले आहे, त्यांच्या यातना आणि त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही," असा निर्धार यावेळी करण्यात आला.