सातारा : संविधानाने सर्व नागरिकांना दिलेल्या समान हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, तृतीयपंथीय घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसाठी सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने राजपथ येथील अलंकार हॉल येथे जिल्हास्तरीय तृतीयपंथीय व्यक्ती सक्षमीकरण शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या शिबिरास अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत या स्टॉलच्या माध्यमातून तृतीयपंथी यांनी योजनांची माहिती घ्यावी व योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार, भेदभावाविरोधातील कायदेशीर संरक्षण आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रस्ताविकात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी शिबिराचा मुख्य उद्देश स्पष्ट यावेळी ते म्हणाले, तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे आणि 'तृतीयपंथीय धोरण-२०२४' सह केंद्र शासनाच्या २०१९ च्या अधिनियमानुसार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे हे या आयोजनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथीय बांधवांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती उपलब्ध झाली. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, कौशल्य विकास व रोजगार विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कामगार कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र या विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शिधापत्रिका, ई-श्रम कार्ड, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, कायदेशीर हक्क आणि विविध कर्ज-कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष अधिकारी श्रुती रकटे, सुवर्णा साळवे, विकास गायकवाड, मनीषा सावंत यांच्यासह समतादूत व समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.