दिल्ली : एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून तीव्र आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी राजकीय पातळीवरून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र होत असतानाच राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाहीत, तसेच धर्मेंद्र प्रधान यांचं खातं बदलून चालणार नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून वगळा’, अशी मागणी केली आहे.
याबाबत राहुल गांधी म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी ही विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांना शिक्षा मिळावी ही आहे आणि तिसरी मागणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी ही आहे. या मागण्या मी सांगितलेल्या नाहीत, तर देशभरातील विद्यार्थ्यांकडून ही मागणी केली जात आहे.
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, सरकार धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून हटवून अन्य मंत्रालयात पाठवण्याचा विचार करत आहे, असं मला समजलं आहे. मात्र असं करणं आम्हाला अजिबात मान्य नसेल. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणाचा चेहरा बनले आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसानझालं आहे. त्यामुळे त्यांचं केवळ मंत्रालय बदलून चालणार नाही तर त्यांना पूर्णपणे पदावरून हटवलं पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.