सातारा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत दि. २३ जुलै रोजी, बाहुळे (ता. जावली, जि. सातारा) येथे कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाहुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सुधारित चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलणी करत भाताची लावणी केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः शेतावर रोटर चालवून चिखलणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपक्रमातील 'बळीराजाशी नाळ जोडणारा' उद्देश सार्थ ठरवला.
शेतकऱ्यांशी संवाद व समस्यांचे निवारण
भात लावणीनंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञान, चारसूत्री भात लागवडीचे फायदे आणि कृषी योजनांवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या प्रसंगी जावली तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रवीण मुदगल, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रकाश राठोड, मंडल कृषी अधिकारी (मेढा) श्री. बापूसाहेब रुपनवर, उपकृषी अधिकारी श्री. प्रसाद फडतरे व श्री. दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सर्वश्री वैभव डोईफोडे, मिलिंद बर्गे, भानुदास चोरगे, संतोष इंगवले, विलास कदम, सचिन बेसके, विशाल डंगारे, धनंजय सापते, नितीन जांभळे, अनिल चव्हाण, रामकृष्ण डंगारे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी शेतात उतरून भात लावणीचा आणि 'एक दिवस बळीराजासाठी' या उपक्रमाचा मनापासून आनंद लुटला. या उपक्रमामुळे कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.