पंढरपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व संत सोपानकाका यांच्या बंधुभेटीचा सोहळा टाळ-मृदंगांच्या व मुखी विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वैष्णवांच्या साक्षीने टप्पा (ता. पंढरपूर) येथे बुधवारी पार पडला.
विठ्ठलाकडे काही मागावं लागत नाही, जे मनात आहे ते नक्कीच मिळतं. तरीही विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे...शेतकरी सुखी होऊ दे असे साकडे घातलं असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना दिली.
बंधुभेट सोहळा व पंढरीची वारी म्हणजे वैष्णवांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होय. मुखी विठ्ठल बोला असे म्हणत सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून लगबगीने चालत होते. कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवाची मांदियाळी पंढरपूर तालुक्यात दाखल झाली. टाळ मृदंगांचा गजर आणि विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम यांच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
मानाच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. ज्ञानोबा- तुकोबांचा जयघोष, खांद्यावर भगवी पताका व टाळ मृदंगाच्या गजरात तरुणाईबरोबर अबालवृद्ध वारकरी लाडक्या विठ्ठलाला अभंगातून दिलेली हाक, ललित वाजणारे टाळ आणि विठू नामाचा गजर करीत पालखी सोहळ्यातील एक एक दिंडी पुढे सरकत होती. त्याचवेळी बंधुभेटीचा सोहळा पाहण्यासाठी पालखीतील वैष्णव व परिसरातील ग्रामस्थांनी सोहळ्याच्या ठिकाणी गर्दी केली होती.