कराड : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी कराड बार असोसिएशनच्या वतीने एक दिवस काम बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनच्या वतीने कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
ॲड. शरद पाटील म्हणाले, पेपर फुटल्यानंतर नव्याने परीक्षा घेऊन निकाल जाहीर केले, त्यामध्येही मोठ्या प्रमाणात घोळ झाले आहेत. कराडमधील एका मुलीच्या निकालात घोळ झाला आहे. मुले -मुली दिल्लीमध्ये उपोषण करत आहेत. तरूण पिढी दिशाहीन झाली आहे. आपण पालक आहोत. या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कराड बार पुरोगामी विचाराचा आहे. मात्र सरकार धार्मिक तेढ निर्माण करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी ॲड. पाटील यांनी केली. दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी ॲड. रविंद्र पवार, ॲड.प्रतापराव जानुगडे, ॲड.एम.टी. देसाई, ॲड. विठ्ठलराव राजे भोसले, ॲड.पी.के.घाडगे, ॲड.गौरी पाटील, ॲड. संजय महाडिक, ॲड. शिवाजीराव जाधव, ॲड. शंकर लोकरे, ॲड. राम होगले, ॲड. विद्यारानी साळुंखे, ॲड. अमित जाधव, ॲड. महादेवराव साळुंखे, ॲड. संभाजीराव मोहिते, ॲड. मानसिंगराव पाटील, ॲड. समीर देसाई, ॲड. चंद्रकांत कदम यांच्यासह अन्य वकिलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व वकिलांच्या वतीने एक दिवस कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी बार असोसिएशनच्या कार्यालयात बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीत दिल्लीतील जंतर मंतरवरील आदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबाबत निषेध नोंदवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला.