सातारा : फोन परत का केला नाही, या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून गाडीच्या चावीने जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. ७) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक येथील जय मोटर्स शोरूमबाहेर घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सयाजी पाटील (वय २९, मु.पो. बोरखळ, ता. जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रोहित नाईक (रा. रविवार पेठ, सातारा) याने फोन परत न केल्याचा राग मनात धरून फिर्यादीची कॉलर पकडून त्याला फरफटत नेले. त्यानंतर हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.
यावेळी आरोपीने हाताच्या बेचक्यात गाडीची चावी धरून ती फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली व डाव्या डोळ्याजवळ मारल्याने तो जखमी झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रोहित नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार मोरे पुढील तपास करत आहेत.