सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील उडतरे येथील उड्डाणपुलावर पावसाच्या पहिल्याच सरींनी कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले काम काही दिवसांचा पावसात रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून निघाले असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. निकृष्ट कामाची पावसानेच पोलखोल केली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे उड्डाणपुलावरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
महामार्ग प्रशासनाने मोठ्या अपघाताची वाट न पाहता तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. येथील खड्डे मुजविण्यासाठी केलेली तात्पुरती मलमपट्टी काही तास टिकते आणि पुन्हा रस्ता उखडतो. पहिल्याच पावसात रस्त्याची झालेली दुरवस्था ही निकृष्ट दर्जाच्या कामाची पोच आहे. त्यामुळे उडतरे येथील उड्डाणपुलावरील रस्त्याची तातडीने दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.