परळी : खोऱ्यासह सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी, नित्रळ, अलवडी परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सज्जनगडावरील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानच्या वाहनतळापासून वरच्या वळणावर मोठी दरड कोसळल्याने गडावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दष्टीने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. सातारा-ठोसेघर-चाळकेवाडी मार्गावर सज्जनगड फाट्याजवळ दोन ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला.
संबंधित यंत्रणांनी झाडे हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, सज्जनगडावरील श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानच्या वाहनतळापासून वरच्या वळणावर मोठी दरड कोसळल्याने गडावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दष्टीने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक निसर्गप्रेमींनी ठोसेघर, भांबवली आणि केळवली धबधब्यांकडे गर्दी केली.