सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून २४ तासांत नवजा येथे ८६ मिलिमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाला सुरुवात झाल्याने २ हजार ५५६ क्युसेक वेगाने पाणीधरणात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून १४.२४ टीएमसी झाला आहे. तसेच जिल्ह्यात अनेक भागात पाऊस होत असल्याने खरीप हंगाम पेरणीला गती मिळू शकते.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे मागील सोमवार आणि मंगळवारी पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, नवजा आणि कोयना खोऱ्यातही धुवाधार पाऊस पडला. पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली. तर सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मान्सूनचा पाऊस शेती क्षेत्राला गती देणार असे स्पष्ट झाले.
पण, नंतर तीन दिवस पावसाची उघडीप होती. दिवसभर ढगाळ वातावरण तयार व्हायचे. सातारा शहरातही पावसाची उघडीप राहिली. मात्र, रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय झालेला आहे. यामुळे अनेक भागात समाधानकारक पाऊस पडू लागला आहे.
पश्चिम भागात कोयना, महाबळेश्वर आणि नवजा परिसरात रविवारी दुपारपर्यंत पाऊस झाला नव्हता. मात्र, सायंकाळनंतर एकसारखा पाऊस कोसळू लागला. यामुळे ओढे, नाले वाहू लागले. तसेच भात खाचरातही पाणी साठले. खटाव आणि माण तालुक्याच्या काही भागात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणीच्या कामाला गती येणार आहे. तसेच काही भागातील जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.