बी.बी.एफ.पेरणी देईल पीक उत्पादन वाढीची हमी; हवामान बदलाच्या आव्हानांवर प्रभावी उपाय

संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

by Team Satara Today | published on : 25 June 2026


राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दृष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.  त्यादृष्टीने शासनाकडून अनेक बाजूंनी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

दि. 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या  शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय झाला आहे. यंदा पाऊस कमी असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन प्रयत्न करीत आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सून हंगामात पावसाचे उशिरा आगमन, पावसातील खंड, अतिवृष्टी तसेच पावसाची लवकर माघार यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  याचबरोबर बदलत्या हवामानाचा शेती उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पीक लागवड तंत्रज्ञानात आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, भूईमूग, बाजरी, भात, नाचणी, मूग, उडीद, घेवडा आणि मका या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, सध्या जिल्ह्यात अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक सपाट पद्धतीऐवजी बी.बी.एफ. (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

बी.बी.एफ. तंत्रज्ञान म्हणजे काय?

बी.बी.एफ. पद्धतीमध्ये शेतात सुमारे ३.५ ते ४ फूट रुंद वरंबे (बेड) तयार करून त्यावर ओळींमध्ये पिकांची पेरणी केली जाते. विशेष बी.बी.एफ. यंत्राच्या सहाय्याने एकाच वेळी मशागत, खतांची मात्रा आणि बियाणे पेरणी केली जाते. वरंब्यांच्या मधील सऱ्यांमधून अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होतो, त्यामुळे पिकांच्या मुळांना पुरेशी हवा मिळते.

बी.बी.एफ. पद्धतीचे फायदे

पीक उत्पादनात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता.

रोपांमध्ये योग्य अंतर राखले जात असल्याने वाढ चांगली होते.

सूर्यप्रकाश आणि हवेचा पुरेसा प्रवाह मिळतो.

पावसाचे पाणी साचत नसल्याने बियाणे कुजण्याचा धोका कमी होतो.

जमिनीची धूप कमी होते आणि सुपीक मातीचे संरक्षण होते.

मुळांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते.

कीड, रोग आणि तण व्यवस्थापन सुलभ होते.

खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनक्षमता वाढते.

मशागत, फवारणी आणि आंतरमशागत कामे सोपी होतात.

मजुरी, वेळ आणि खर्चात बचत होते.

बियाण्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्यांपर्यंत बचत होते.

जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहिल्याने दुष्काळी परिस्थितीतही पिकांना फायदा होतो.

पावसाच्या दीर्घ खंडाच्या काळात साठविलेला ओलावा पिकांच्या वाढीस मदत करतो.

हवामान बदलामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, भूईमूग, बाजरी, मूग, उडीद, मका आदी पिकांसाठी बी.बी.एफ. लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत बी.बी.एफ. औजारासाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ही सातारा जिल्ह्याच्या कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज
पुढील बातमी
शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय

संबंधित बातम्या