सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा सध्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अनेक धरणे उघडी पडली आहेत. या परिस्थितीचा विचार करून भविष्यात धरणांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून हाती घ्यावी, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी पांटबंधारे विभाग व सरकारला केले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ सुमारे २० टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ४४ मोठे, मध्यम व लघु धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या अवघा १५ टक्के पाणीसाठा उरला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातही केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ही परिस्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक भयावह ठरू शकते.
धरणांमध्ये अनेक वर्षांपासून गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता कमी झाली आहे. सध्या धरणांतील पाणी कमी असल्याने गाळ काढण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. प्रशासनाने नियोजन करून सर्व धरणांमध्ये एकाचवेळी गाळ उपसा मोहीम राबवावी. गाळ काढण्यासाठी लोकसहभागाची हाक देत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना शेतीसाठी उपयुक्त असलेला गाळ मोफत नेण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे धरणांची साठवण क्षमता वाढेल, शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असेही निवेदनात म्हटले आहे.