सातारा : सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमधील दरार कमी झाली नव्हता. तो कमी करून तिन्ही पक्षांना एकत्रित आणण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यात मुंबईत बैठक झाली. त्यातील चर्चेनुसार तीनही पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याबाबत एकमत झाले.
स्थानिक नेत्यांना त्याबाबतची सूचना देण्यात येणार आहे. मकरंदआबांनी राष्ट्रवादीच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या. या मतदारसंघात भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात लढत आहे. महायुतीतील तीन पक्षांमध्ये सध्या एकमत नसल्याचे दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कराडात बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीकडे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. बैठक असताना भाजपचेच मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. त्यामुळे ती भाजपचीच बैठक ठरली होती.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपच्या कार्यशैलीबद्दल नापसंती व्यक्त केली होती. निर्णयाचे अधिकार हे मंत्री मकरंद पाटील यांना दिले होते, पण भाजपच्या पाठिंब्याबाबतचा निर्णय झाला नव्हता.
शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी फडणवीस यांच्यासमवेत शिंदे, तटकरे, मकरंद पाटील यांची बैठक झाली. यात मकरंदआबांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवल्या. मुख्यमंत्र्यांनी मकरंदआबांचे म्हणणे ऐकून घेतले. भाजपमधील नेत्यांशी चर्चा करू, असा शब्द त्यांनी दिल्याचे समजते. भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांचा हा निरोप सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द मकरंदआबांनी दिल्याचे समजते.