पुणे : राज्य सरकारने नवीन शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये लागू करण्यात येणाऱ्या 'त्रिभाषा सूत्राच्या' अंमलबजावणीला सध्या स्थगिती दिली आहे. १५ जूनपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात हे धोरण लागू केले जाणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्रिभाषा धोरण अंमलबजावणीबाबत गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी आणि त्यावर शासनाकडून अंतिम निर्णय येणे अजून बाकी आहे. त्यामुळे तिसऱ्या भाषेबाबत जोपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत शाळांमध्ये सध्या सुरू असलेला प्रचलित अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकेच वापरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नवीन निर्णयानुसार इयत्ता ५ वीपासून पुढील वर्गांसाठी पूर्वीपासून लागू असलेली तिसरी भाषा पद्धतीच नवीन धोरण आणि नवीन अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत कायम राहील. तसेच शिक्षण विभागाने आणखी एक बदल केला असून, शाळांमध्ये पूर्वी ओळखला जाणारा 'कार्यानुभव' हा विषय आता 'कार्यशिक्षण' या नवीन नावाने ओळखला जाईल. शालेय शिक्षण विभागाने या निर्णयासोबतच इयत्ता पहिली ते आठवीसाठीचे नवीन वेळापत्रक, विषय योजना, आणि शालेय कामाचे दिवस जाहीर केले आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या शाळांसाठी इयत्ता तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवीचा सुधारित विषय आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
प्राथमिक स्तर इयत्ता ३ री ते ५वी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी ही प्रथम भाषा असेल, तर इंग्रजी ही द्वितीय भाषा असेल. तसेच गणित, आपल्या सभोवतालचा परिसर (भाग १ व २), कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आणि कार्यशिक्षण. यासोबत प्रचलित पद्धतीनुसार एक भाषा विषय असेल. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी ही प्रथम भाषा असेल, तर मराठी ही द्वितीय भाषा असेल तसेच गणित, आपल्या सभोवतालचा परिसर (भाग १ व २), कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आणि कार्यशिक्षण यांचा समावेश असेल.
यंदा भाषानिवडीचा संभ्रम दूर
इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय भाषेशिवाय गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण हे विषय अनिवार्य असतील. तसेच प्रचलित पद्धतीनुसार तिसरा भाषा विषय शिकवला जाईल. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तूर्तास शाळा, शिक्षक आणि पालकांवरील नवीन भाषा निवडीचा आणि नवीन पाठ्यपुस्तकांचा संभ्रम दूर झाला असून, यंदाचे शैक्षणिक वर्ष जुन्याच भाषा रचनेनुसार पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.