मेढा : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून परतणाऱ्या जावली तालुक्यातील एका तरुण शिवभक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसरात झालेल्या या अपघातामुळे केंजळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
केंजळ येथील कपिल धनंजय केंजळे (वय २८) हे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गेले होते. सोहळ्यानंतर ते सख्खे मावसभाऊ अविनाश सावंत (वय ४२, रा. चिचणी) यांच्यासोबत मोटारसायकलवरून घरी परतत होते. पोलादपूरजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कपिल केंजळे यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी अविनाश यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.