अहिल्यानगर येथील कार्यक्रमात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची कर्जमाफीची घोषणा; येत्‍या 10 दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

by Team Satara Today | published on : 31 May 2026


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्‍या 10 दिवसात होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगर येथील कार्यक्रमात याची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असणारी कर्जमाफी येत्‍या 8 ते 10 दिवसांत करु अशी ग्वाही त्‍यांनी येथे दिली आहे. चौंढी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2 लाखांपर्यंत थकीत खातेदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्‍साहन अनुदान अशी ही कर्जमाफी मिळणार आहे.

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या परवानगीने घोषणा

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित होते. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी भाषणाला सुरवात करताना या व्यासपीठावर असलेल्या मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी घोषणा करत आहे. असे सांगत येत्‍या दहा दिवसात कर्जमाफी केली जाईल असे कृषीमंत्री यांनी म्हटले आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंधारणचे काम आजही मार्गदर्शक आहे. तसेच या चौंडी गावाच्या विकासासाठी बाराशे कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे असेही त्‍यांनी सांगितले.

यांना मिळणार कर्जमाफी

कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार राज्य सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच बँकेचे कर्ज नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत

दरम्यान यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे संकेत दिले होते. 30 जूनपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता होती. राज्य सरकारची कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकर्‍यांना थेट लाभ देण्यासाठी प्रशासनिक हालचाली वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज कृषीमंत्री भरणे यांनी यावर शिक्कामोर्तब केले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुमधुर स्वरांनी लाखो हृदयांचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन
पुढील बातमी
संगम माहुली कृष्णा नदी घाट परिसर स्वच्छता अभियानात तब्बल 350 किलो कचर्‍याचे संकलन; पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित

संबंधित बातम्या