सातारा : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्वीसारखा मजबूत पाहायला मिळणार आहे. अनेक समस्यांमुळे सध्या सर्व नागरिक कंटाळून गेलेले आहेत त्यामुळे भाजप सरकार विरोधात 29 मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीव्र आंदोलन सातारा जिल्ह्यात होईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी सर्व समावेशक सूचनांचा आदर करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये दि. 27 मे रोजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विचार विनिमय करणार आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सचिव नरेश देसाई, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला पदाधिकारी सौ. सुवर्णाताई पाटील, सौ. समिंद्रा जाधव, सौ. वैशाली जाधव, सौ. भिसे, समीर राजेघाडगे, अतुल शिंदे व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
महागाई, वाढती बेरोजगारी, नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करूनही आत्महत्या करावी लागत आहे. औषधाची दुकाने बंद करण्याचे आंदोलन करावे लागत आहे. शेतकर्यांच्या शेती पिकाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. सर्व स्तरावर भाजप सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी दि. 29 मे रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवन कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये तरुण, शेतकरी, बेरोजगार युवक व महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली असली तरी त्याची जबाबदारी शिक्षण मंत्री घेत नाही. उलट जे दोषी आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून त्यांची स्वच्छता मोहीम राबवली जाईल, अशी टीका शिंदे यांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोर्चा काढला जाईल आणि तिथल्या लोकांना नोकरी व्यवसायासाठी प्राधान्य द्यावे, यासाठीही आंदोलन होत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण आज बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. 27 रोजी होत आहे. कोणत्या पक्षाने कोणत्या ठिकाणी उमेदवार द्यायचे, याबाबत चर्चा होणार आहे. सध्या सातारा, सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना व राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमय घडामोडीवेळी भाजप नेत्यांनी फसवले होते. आम्ही राष्ट्रवादी व शिवसेनासोबत होतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत शिवसेना व राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी. त्यांना भाजप पक्ष दाबत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
सध्याचे एस.पी. चांगले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पोलिसांच्या विरोधात नाही
दररोज सामान्य माणसांना अडचणीत आणून उद्योगपतींना फायदा व्हावा असे कायदे केले जात आहेत. बेरोजगारी वाढत असून काल लेबर कोर्ट मंजूर झाले आहे. ते किमान वेतन देण्यासाठी असले तर मग नोकरीची हमी कोण देणार? असाही मार्मिक प्रश्न त्यांनी केला.
भारत देश स्वाभिमानी व स्वतंत्र आहे. परंतू, आजही अमेरिकेच्या दबावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निर्णय घ्यावे लागत आहेत. पंतप्रधान मोदी अपयशी ठरलेले आहेत. कोरेगावसारख्या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना इंटरनेटच्या द्वारे गंडवले जात आहे. त्या इंटरनेट कॅफे व क्लासेसला कोणी परवानगी दिली? कोणी आश्रय दिला? एकाच इमारतीत कोचिंग क्लास व हा उद्योग होता. त्याचे उद्घाटन झाले होते. सध्याचे एस.पी. चांगले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पोलिसांच्या विरोधात नाही तर जे लोकांच्या विरोधात काम करतात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. सध्या जे पोलीस अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यांची रजा केव्हा संपते हे मी पाहतोय, असे त्यांनी सांगितले.