महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय - छत्रपती वृषालीराजे भोसले, इतिहास संशोधक, अभ्यासक, विविध संघटनाचा पुण्यात मोर्चा

by Team Satara Today | published on : 22 May 2026


पुणे : महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या अनेक मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्य ही देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केली.

या मोर्चात इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विविध संघटना, संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीईआरटीने हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे.

याबाबत राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. खुद्द राज्य सरकारने पत्र देऊन देखील एनसीईआरटीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या बाबीच्या निषेधार्थ छत्रपती वृषाली राजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्र धर्म मोर्चाचे आयोजन करण्यात आले. लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून दैदीप्यमान इतिहासाला लपवण्याचा आणि खोटा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती घराण्यासह संपूर्ण महाराष्ट्राकडून आपण त्याचा निषेध करीत आहोत, असे छत्रपती वृषाली राजे यांनी यावेळी नमूद केले.

तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबतीत केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करतानाच त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशाची पाठ्यपुस्तकात पुनर्स्थापना होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी बाळासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर
पुढील बातमी
नीट पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीचे साताऱ्यात निषेध आंदोलन; पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

संबंधित बातम्या