सातारा : स्व. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून अलौकिक अशी क्रांती घडवली आहे. अजिक्य उद्योग समुहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत कायम शेतकरी हित जोपाण्याचा त्यांचा वारसा अखंडपणे चालवू, असा निर्धार स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या ८२ व्या जयंतीदिनी करण्यात आला.
सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिंक्य उद्योग समुहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे कार्यस्थळावर स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला. स्व. भाऊसाहेब महाराजांना विविध मान्यवरांनी विनम्र अभिवादन व पुष्पांजली अर्पण केली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक मंडळातील सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीदिनी एकत्र येवून सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले महान कार्य, त्यांची विचारसरणी, आत्मसन्मानपूर्वक वागणुक, निस्वार्थी व अभ्यासू वृत्ती आदी बाबत त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांची कास धरून सहकार चळवळ वृध्दींगत करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अंगिकारलेली विकासकामाची धुरा, त्यांचे आचार, विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू, असे अभिवचन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले. भाऊसाहेब महाराज यांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सातारा तालुका आणि जिल्ह्यासह राज्यभरात असंख्य सहकारी संस्थांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. केवळ सहकारी संस्था उभारून चालणार नाही तर त्यांना पाठबळ दिले पाहिजे. त्या संस्था उभारीस येवून त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी सहकारमंत्री असताना राज्यभरातील सर्वच सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरु आहे. यापुढेही ही चळवळ वृध्दींगत होण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याची शपथ उपस्थित मान्यवरांनी घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अनिल देसाई, अजित साळुंखे, कामेश कांबळे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतिश चव्हाण, किरण साबळे- पाटील, वनिता गोरे, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे, उपसभापती सुषमा जाधव, सदस्य राहूल शिंदे, सुनीता सरडे, सरिता इंदलकर, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष धनाजी शेडगे, सुनील काटे, भाई वांगडे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, रवी कदम, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, वसंतराव टिळेकर, पंडीतराव सावंत, गणपतराव शिंदे, गणपतराव मोहिते, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, उप सभापती मधुकर पवार, संचालक विजय पोतेकर, राजेंद्र यादव, पदमसिंह फडतरे, जावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, सागर धनावडे, अजिंक्य उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मजूर, युनियन सरचिटणीस सयाजी कदम, सातारा आणि जावली तालुक्यातील कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.