सातारा : कामथी, ता. सातारा येथे आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हॅन्ड ब्रेक निघाल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे.
लीलाबाई उत्तम अडागळे (वय 56), मालुबाई सीताराम अडागळे (वय 50), कल्पना सागर आवळे (वय 36), गार्गी सागर आवळे (वय सहा) अशी मृतांची नावे आहेत. तर अर्चना सागर मोरे (वय 32, सर्व रा. कामथी, ता. सातारा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
उरमोडी धरणाच्या लगत असलेल्या कामथी येथील सिताराम आडागळे यांच्या कुटुंबातील लग्नकार्य निमसोड, ता. खटाव या पुनर्वसित गावात चार दिवसांवर आहे. यासाठी मागील दोन दिवसांपासून घराचे साहित्य, जनावरे हलवण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्य आयशर टेम्पो मध्ये जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हॅन्ड ब्रेक निघाला व गाडी उतारावरून थेट धरणाकडे गेली आणि तिथे पलटी झाली. या अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू असून तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.