सातारा : आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला अद्यावत आराखडा 20 मे 2026 पर्यंत सादर करावा. तालुका व गावपातळीवर 15 मे पूर्वी पूर्वतयारी बैठका घ्याव्यात. तसेच हवामान खात्याने यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्या अनुषंगाने टंचाईचा आराखडाही तयार करावा तसेच पाणी पुरवठा विभागाने आणि सिंचन विभागाने त्यांच्या पाण्याच्या स्त्रोतांची मॅपिंग तातडीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, सिंचन मंडळ साताराचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करून 1 जूनपासून 24x7 नियंत्रण कक्ष सुरू करावे. शोध व बचाव साहित्याची चाचणी 25 मेपूर्वी पूर्ण करावी. आपत्तीजन्य घटना घडल्यास तात्काळ जिल्हा व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागाला धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर, पूरग्रस्त भागात अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तसेच नालेसफाई व पूल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. घाट रस्त्यांसाठी नोडल अधिकारी नेमून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत. घाट रस्त्यांवर दरड कोसळल्यास ती तातडीने हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. पुलांची प्रत्यक्ष पाहणी करुन दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. पर्जन्यमापक यंत्रांची पाहणी करून दररोज पावसाची नोंद सादर करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाला साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधसाठा, पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना, तसेच रुग्णालये व अॅम्ब्युलन्स सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्कालीन आराखडे तयार करून पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन करावे, पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना वेळेवर इशारा द्यावा.
विद्युत वितरण विभागाने अतिवृष्टीदरम्यान अपघात टाळण्यासाठी तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ठेवावी, तसेच झाडांच्या फांद्या छाटणी व यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. पुरवठा विभागाने दुर्गम भागात अन्नधान्य व गॅसचा पुरेसा साठा ठेवावा, शिक्षण विभागाने शाळा स्थलांतरासाठी तयार ठेवाव्यात, तर पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. पूनर्वसन स्थलांतरासाठीचे शेड सुस्थीतीत ठेवावे. त्यांची स्वच्छता करावी. ज्या ठिकाणी नवीन स्थलांतर शेड उभारायचे आहे त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. संभाव्य पूरस्थिती व आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देत मान्सूनपूर्व तयारी अधिक प्रभावी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सर्व यंत्रणांना दिल्या.