सातारा : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, भुईंज यांच्या वतीने आबासाहेब वीर यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यंदा देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 9 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता किसनवीर नगर (ता. वाई) येथील कॉलनी ग्राउंडवर करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती खासदार नितीन काका पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली. कार्यक्रमास ना. मकरंद जाधव पाटील, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, तसेच शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासात गडकरी यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले.