फलटण : येथील फलटण-पंढरपूर रस्त्यावर एका भीषण अपघाताची घटना समोर आली असून, यामध्ये एका धाडसी तरुणाच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले आहेत.
याबाबत माहिती अशी की, आज दि. ०२ रोजी दुपारी फलटण शहराजवळ असणाऱ्या नीरा उजवा कॅनॉलवरील रावरामोशी पुलावरून भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कार अचानक अनियंत्रित होऊन थेट कॅनॉलच्या पात्रात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कार पाण्यात पडताच तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकजण काय करावे या विवंचनेत असतानाच, मुंजवडी ता. फलटण येथील रहिवासी गोविंद दिलीप बोडरे यांनी कोणतीही भीती न बाळगता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने कॅनॉलच्या पात्रात उडी घेतली. त्यांनी अत्यंत वेगाने हालचाली करत बुडणाऱ्या कारमधील दोघांना सुखरूप बाहेर काढले. गोविंद बोडरे यांच्या या अचाट धैर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, सर्व स्तरांतून त्यांच्या या शौर्याचे आणि धाडसाचे मोठे कौतुक केले जात आहे. या अपघातातून दोघे जण थोडक्यात बचावल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.