सातारा : राजवाडा चौपाटी परिसरातील वाढत्या वादविवाद आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिकांनी एकत्र येत शिस्त आणि स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली आहेत. ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी सर्वांनी एकमताने नियमावली तयार केली असून ती नगरपरिषदेकडे सादर करण्यात आली आहे.
या नव्या उपक्रमानुसार, चौपाटी परिसरात कोणत्याही प्रकारचे वाद, गोंधळ किंवा अनुशासनभंग सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर सामूहिक कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास संबंधितांचा व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णयही अमलात आणला जाणार आहे.
स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेत कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. उरलेले अन्न, प्लास्टिक किंवा इतर कचरा परिसरात न टाकता योग्य ठिकाणीच टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीने करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दर आठवड्याला एक दिवस संपूर्ण चौपाटीची स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मद्यपानास पूर्ण बंदी, तसेच सध्याच्या गाड्यांव्यतिरिक्त नवीन गाड्यांना प्रवेश न देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.
नगरपालिकेच्या सूचनांचे पालन करत, दंडात्मक कारवाई स्वीकारण्याची तयारीही व्यावसायिकांनी दर्शवली आहे. या पुढाकारामुळे चौपाटी परिसर अधिक सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी आकर्षक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठळक निर्णय ▪ चौपाटीवर वादविवादास पूर्ण बंदी, ▪ कचरा व्यवस्थापनासाठी कडक नियम, ▪ आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम, ▪ मद्यपानास सक्त मनाई, ▪ नवीन गाड्यांना परवानगी नाही, ▪ नियमभंग केल्यास दंड व कारवाई.