सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे तसेच त्यांच्या कार्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एनसीईआरटीकडून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या कथित प्रयत्नावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवरही पडदा पडू शकतो आणि सध्या तोच प्रयत्न सुरू आहे.”
राजधानी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वराज्य स्थापनेसाठीचे त्यांचे कार्य आणि सर्वधर्मसमभावाची भूमिका नव्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व घटकांनी एकत्र येऊन शिवचरित्राचा खरा इतिहास जपावा
“शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबाबत कोणतीही दिशाभूल सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शिवचरित्राचा खरा इतिहास जपावा, अभ्यासावा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.