सातारा : सातारा येथील आपल्या निवासस्थानी आयोजित विशेष जनता दरबाराच्या माध्यमातून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज शेकडो नागरिकांशी थेट संवाद साधला. जिल्हाभरातून आलेल्या जनतेच्या अडीअडचणी समजून घेत असतानाच, मकरंद आबांनी संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून कामांना गती देण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या या आक्रमक आणि तत्पर कार्यपद्धतीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
आजच्या या जनता दरबारात सकाळपासूनच निवासस्थान परिसर लोकांनी गजबजून गेला होता. ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न, महसूल विभागातील फेरफार नोंदी, वीज वितरण कंपनीच्या तक्रारी आणि मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी मोठ्या अपेक्षेने मकरंद पाटील यांची भेट घेतली. प्रत्येक नागरिकाचे निवेदन स्वीकारल्यानंतर पाटील यांनी केवळ आश्वासन न देता, जागेवरच संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणांची वस्तुस्थिती जाणून घेतली. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून यामध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
मकरंद पाटील यांच्या कामाच्या वेगवान शैलीमुळे सातारकरांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. आजच्या या भेटीगाठींच्या दरम्यान त्यांनी केवळ प्रशासकीय कामांचा आढावा घेतला नाही, तर वैयक्तिक अडचणी घेऊन आलेल्या गरजू व्यक्तींनाही मदतीचा हात दिला. प्रशासकीय यंत्रणा आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून या जनता दरबाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या हक्काचा माणूस थेट समोर बसून प्रश्न सोडवत असल्याच्या भावनेने सातारकरांनी समाधान व्यक्त केले.
या जनता दरबाराच्या माध्यमातून मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा आपण सामान्य जनतेच्या सुख-दु:खात सदैव पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले आहे. जनतेच्या तक्रारींवर पुढील काही दिवसांत नेमकी काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा देखील स्वतः मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सातारकरांच्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला असून मकरंद आबांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.