सातारा : गोजेगाव येथील जुन्या रस्त्याच्या वादातून दोन जणांना बियरच्या बाटलीने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दिलीप बर्गे (रा. चिंचणेर वंदन) दिवेकर (पूर्ण नाव माहित नाही) प्रसाद उर्फ पिंटू किसनराव लगड, दिवेकर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि कडेठाण, ता. दौड, जि. पुणे येथील दोन अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोजेगाव गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल राजमुद्रा येथे वाद निर्माण झाला. वडीलोपार्जित जुन्या रस्त्याच्या वादाचा राग मनात धरून वरील ५ जणांनी संगनमत करून फिर्यादी नितीन पंढरीनाथ बर्गे (वय ४१, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत नितीन बर्गे यांना धमकावले.
त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.या दरम्यान प्रसाद उर्फ पिंटू किसनराव लगड याने बिअरच्या बाटलीने फिर्यादीच्या डोक्यावर व उजव्या खांद्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादीचा मित्र लक्ष्मण शिवाजी माने याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केले. यानंतर दत्तात्रय दिलीप बर्गे याने नितीन बर्गे याच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर लाथ मारून शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच दिवेकर (पूर्ण नाव माहित नाही) याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली व दोन अनोळखी संशयितांनी शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नितीन बर्गे यांनी दाखल केली आहे.ही घटना दि.१५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करत आहेत.