सातारा : जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, असे साकडे सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला फेर्या मारत पारंपारिक पद्धतीने पूजा विधी करत घातले. यावेळी सातारा शहरामधील गोडोली, रविवार पेठ, सोमवार पेठ, पोलीस मुख्यालय परिसर तसेच शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेचा पारंपारिक साज पाहायला मिळाला. यानिमित्ताने फळ बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली.
सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणल्याची पुराणात कथा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, ही या वटपौर्णिमा व्रता मागची श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार जेष्ठ मासातील पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. दुपारी सव्वा एक वाजल्यापासून पौर्णिमेला सुरुवात झाली. सकाळपासूनच सातारा शहरात वडाची पूजा करण्यासाठी हळद-कुंकू, ओटी, बांगडी, वस्त्रमाळ, आंबे इत्यादी वस्तू खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसत होती.
हिरवा शालू, पैठणी, नाकात नथ, हिरवा चुडा अशा सौभाग्य लेण्याने अलंकृत महिलांनी वटवृक्षाची पूजा केली येथील. कुरणेश्वर गणपती परिसरामध्ये तसेच पोलीस मुख्यालय परिसरातील वडाच्या झाडाला फेर्या मारताना महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. याशिवाय गोडोली, महादरे, मोरे कॉलनी, भुरके कॉलनी, प्रतापगंज पेठ, मंगळाई कॉलनी, जगतापवाडी, पिरवाडी, निसर्ग कॉलनी इत्यादी भागांमध्ये वडाला फेर्या मारून सुवासिनींनी आपल्या साताजन्माच्या मनोकामना प्रकट केल्या. वटपौर्णिमा साजरी होणार्या परिसरात सातारा पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात होता. चैन स्नॅचिंग च्या घटना घडू नयेत म्हणून सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने येथील रस्त्यावर पेट्रोलिंग केले.
फळ बाजारामध्ये या निमित्ताने मोठी उलाढाल झाली. दीडशे रुपये डझन या दराने आंबा विकला गेला. तसाही आंब्याचा सिझन आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र वटपौर्णिमेच्या निमित्ताने तोतापुरी व केशर आंब्याला चांगला दर मिळाला.
कर्तव्याबरोबरच परंपराही जपली सावित्रीच्या लेकींनी
महिला पोलीसांना सण-उत्सव असले तरी कर्तव्यावर हजर रहावेच लागते. मात्र, कर्तव्य बजावतानाच आपल्या परंपरागत सणांना, आपल्या परिवाराप्रती असलेले प्रेम, जिव्हाळाही त्या विसरत नाहीत. सात जन्म हाच पती मिळावा, म्हणून आज वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला दोर्याने फेरे मारले जातात. महिला पारंपारिक पेहरावात जाऊन वटपौर्णिमानिमित्त वटवृक्षाची पूजा करतात. मात्र, ऑन ड्युटी चोवीस तास असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांनी देखील कर्तव्य बजावत वटवृक्षाची पूजा करुन जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असे वटवृक्षाला साकडे घातले.