सातारा : कोळकी, ता. फलटण, जि. सातारा येथे राहणार्या मंगल मोहन काळे यांनी गावातील काही उपद्रवी प्रवृत्तीच्या विरोधात खंडणीची तसेच खोटे गुन्हे दाखल केले जातील, अशी धमकी येत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. यावेळी त्यांनी माझ्या घरातील माझ्या दोन्ही मुलांचा घात करण्यात आला आहे, असा आरोपही यावेळी संबंधितांवर केला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मंगल काळे म्हणाल्या, फलटण पोलीस माझ्यावर झालेल्या अन्याया संदर्भात गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मी पत्रकारांसमोर ही व्यथा मांडत आहे. या तक्रारीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पाठवले आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये तब्बल 17 एकत्रित सदस्य आहेत. गावातील पारधी जमातीचे रणदिव्या उर्फ रमेश फारम पवार, लीलमा रमेश पवार, कोहिनूर रमेश पवार, वासंती रमेश पवार, गायत्री अमोल पवार व अमोल विरोधखान पवार हे सर्वजण काळे कुटुंबीयांना सतत धमकी देऊन आम्हाला पाच लाख रुपये द्या अन्यथा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू, अशी धमकी देत आहेत.
पुढे बोलताना मंगल काळे म्हणाल्या, या प्रकरणांमध्ये माझा मोठा मुलगा अजय काळे व धाकटा मुलगा हैराण काळे या दोघांनाही याच व्यक्तींनी संपवले आहे. अजय काळे याचा कर्नाटक राज्यात घात करण्यात आला, तर हैराण याला तुझी बायको चरित्रहीन आहे, असे सांगत मानसिक त्रास दिला. त्यातूनच त्याने आत्महत्या केली. वरील आरोपी मला सतत त्रास देत असून सातत्याने धमकी देवून खंडणी मागत आहेत. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यांनी तातडीने दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मंगल काळे यांनी केली आहे.