बार्बाडोसनंतर आता पाकिस्तानमध्ये टीम इंडिया तिरंगा फडकवणार?

जय शाह यांनी केली घोषणा

by Team Satara Today | published on : 22 August 2024


नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत टीम इंडियाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघ चॅम्पियन झाला. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकणे ही टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब होती, कारण 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. टी20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवणार असल्याचे भाकीत केले होते. आता जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे.

टीम इंडियाने 2024 टी-20 विश्वचषकाद्वारे 13 वर्षांपासून सुरु असलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. आता जय शाह  यांनी पुन्हा एकदा टीम इंडिया  आयसीसी स्पर्धेत तिरंगा फडकवणार असं म्हटलं आहे. जर आम्हाला 1.4 अब्ज लोकांचा आशीर्वाद असेल तर आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही जिंकू, असं जय शाह यांनी सांगितलं. सीएटी अवॉर्ड्सवर बोलताना जय शाह म्हणाले, "जसे मी राजकोटमध्ये सांगितले की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवेल, येथे मी म्हणतो की 1.4 अब्ज लोकांचा आशिर्वाद मिळाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्येही असेच करू...

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे, जी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाईल. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे पाकिस्तान या स्पर्धेच्या यजमानपदावर ठाम आहे. दुसरीकडे, पाकिस्तान दौऱ्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणताही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. 2008 पासून टीम इंडिया पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळायला गेली नसल्यामुळे 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेच घडण्याची शक्यता फार कमीच आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील हायब्रिड मॉडेलप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यास सहमत नाही. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारताने 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16  वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुनीता विल्यम्स आणि विल्मोर मर्यादित 96 तासांच्या ऑक्सिजनसह अंतराळात अडकण्याची शक्यता 
पुढील बातमी
आयेशा टाकियाचा नवा लूक पाहून नेटकरी चक्रावले

संबंधित बातम्या