सातारा : कडाडलेल्या महागाईत नागरिकांना माफक दरातील दिवाळी फराळातील लाडू, चिवडा मिळावा यासाठी येथील व्यापारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सलग 21 व्या वर्षी व्यापारी लाडू चिवडा महोत्सव आयोजित केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमातून लाडू चिवडा महोत्सव सुरु ठेवण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. १५ रोजी संस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांच्या हस्ते करण्यात येत आहे. संस्थेची स्थापना 17 मार्च 1991रोजी झाली. तेव्हापासून संस्थेच्या सभासदांच्या अर्थविषयक गरजा भागवीत असतानाच विविध समाजिक उपक्रमांना संस्था अर्थसहाय्य करते. विविध समाजहिताचे उपक्रम राबवित असते, दिवाळीपूर्वी लाडू व चिवडा तयार करण्यासाठी बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात, याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.
हा लाडू चिवडा ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नागरिकांना देण्यात येणार आहे, असे श्री. पिलके यांनी सांगितले. यावर्षी मजुरी, इंधन, लागणारा कच्चा माल यामध्ये अधिक वाढ झाली आहे, असे असतानासुद्धा चिवडा केवळ 190 रुपये व लाडू 190 रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यंदाचा लाडू चिवडा महोत्सव बुधवार दि. १५ पासून 23 आॅक्टोबर या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये सुरु ठेवण्यात येणार आहे. श्री. प्रभाकर राऊत मिठाईवाले (मल्हार पेठ, सातारा) येथे या लाडू- चिवडा विक्रीची संपूर्ण व्यवस्था भरतशेठ राऊत, राऊत मिठाईवाले यांच्याकडे करण्यात आली आहे. या उपक्रमास सातारकरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन दिलीप पिलके यांनी केले आहे.