शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त : अ‍ॅड. राजेंद्र गलांडे

by Team Satara Today | published on : 26 June 2025


सातारा : राजर्षी शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त व प्रेरणादायी आहेत, असे मत ज्येष्ठ   विधीज्ञ अ‍ॅड. राजेंद्र गलांडे यांनी व्यक्त केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने नव समाज रचनेचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये विशेष व्याख्यानात 'महाराजांचे सामाजिक न्यायाचे कायदे व सद्यस्थिती' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, विश्वस्त डॉ. सुवर्णा यादव, प्रा. प्रशांत साळवे उपस्थित होते.

अ‍ॅड. राजेंद्र गलांडे म्हणाले, शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहेत. त्यांनी  केलेले कायदे काळाच्या शंभर वर्ष पुढचे आहेत. त्यांच्या क्रांतिकारक दूरदृष्टीचे व मोठेपणाचे मर्म पुरते आपल्याला समजलेले नाही. महाराजांनी बहुजन समाजात स्वाभिमान व आत्मभान  निर्माण केले.  अ‍ॅड. गलांडे यांनी  शाहू महाराजांनी  केलेल्या क्रांतिकारक विविध कायद्यांची सविस्तर माहिती यावेळी विषद करुन सद्यस्थितीचे विश्लेषण केले.

दिनकर झिंब्रे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शाहू महाराजांनी धर्मसत्ता, ब्राह्मण पुरोहितशाही विरुद्ध खंबीरपणे बंड करून क्षत्रियत्वाचे हक्क शाबित केले. अब्राह्मणी पुरोहित निर्माण केले. क्षत्रिय जगद्गुरु ची नेमणूक करून शंकराचार्यांच्या पिठाची मक्तेदारी मोडली. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर मंदावलेल्या सत्यशोधक चळवळीला गती दिली. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्याप्रमाणे  स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारलेला नव समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. परंपरा आणि आधुनिकता याचा समन्वय साधून धर्मविचार आचरणात आणला. त्यांना  महर्षी शिंदे यांनी नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दात गौरविले आहे. महाराजांचा वाढदिवस सार्वत्रिकपणे मोठ्या उत्साहात करावा असेआवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषदेत  ठराव मांडून केले. याचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे.

या कार्यक्रम प्रसंगी संबोधी प्रतिष्ठानचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव पोळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिनकर झिंब्रे यांच्या हस्ते  भारतीय संविधान प्रास्ताविका स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह  अ‍ॅड. हौसेराव धुमाळ  यांनी आभार मानले. डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सहकार्यवाह  अनिल बनसोडे, विश्वस्त  यशपाल बनसोडे प्रकाश गायकवाड, प्रा. रमेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार, अरुण जावळे, अनिल वीर,प्राचार्य अरुण गाडे, मुकुंद व अस्मिता बहाळकर, प्रकाश खटावकर, अनिल भोसले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर  श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवी मुंबई विमानतळावर लागणार यूजर शुल्क
पुढील बातमी
जुन्या भांडणातून युवकावर ब्लेडने वार

संबंधित बातम्या