जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू; कोयना धरणात ६४ टीएमसी पाणी, कृष्णा, वेण्णा नदीपात्रात पाणी पातळी वाढली

by Team Satara Today | published on : 23 July 2026


सातारा  : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू होती. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कण्हेर, बलकवडी धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला असल्याने कृष्णा, वेण्णा नदीपात्रात पाणी पातळी वाढली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

पुढील चार दिवस राज्याच्या पश्चिम किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून सातारा, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम आहे. मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरू होती. बुधवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

कण्हेर धरणातून बुधवारी सकाळी १६०० क्युसेक पाणी विसर्ग वेण्णा नदीपात्रात झाला. बलकवडी धरणाचा पाणी साठा सोडल्याने नदीपात्रात विसर्ग झाला. सध्या कण्हेर धरणात ९०.४० टक्के इतका पाणीसाठा झाल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे २० सेंटिमीटरने उचलून १००० क्युसेक पाणी सांडव्यावरून वेण्णा नदी पात्रात, तर धरण पायथ्यालगत असलेल्या विद्युत गृहातून ६०० क्युसेक असे एकूण १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. वेण्णा नदीपत्रात पाणी सोडल्याने वेण्णा नदी संथ गतीने वाहत आहे. धरणातून पाणी सोडण्याआधी सायरन वाजवून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला.

कोयना धरणात ६४ टीएमसी पाणी

कोयना धरणात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५८.८४ टीएमसी तर एकूण पाणीसाठा ६३.९६ टीएमसी इतका नोंदवण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी २१२३ फूट ०१ इंच झाली आहे. गेल्या २४ तासांत कोयना परिसरात ८० मि.मी., नवजा येथे १०८ मि.मी., तर महाबळेश्वर येथे १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली. सध्या धरणात ३०,६९४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यातील सुरवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची धावती भेट; स्थानिक लोकप्रतिनिधींशी साधला संवाद
पुढील बातमी
राजकारण करू नका. मोदी सरकार दोषींना सोडणार नाही - उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, दरे तर्फ तांब येथे पत्रकारांशी संवाद

संबंधित बातम्या