चापेकरांच्या बलिदानातून स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चापेकर वाड्यातील राष्ट्रीय संग्रहालयाचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 18 April 2025


पिंपरी चिंचवड : रॅंडच्या वधानंतर फाशीवर जाताना चापेकर बंधुंना क्षणभरही पश्चाताप अथवा भिती वाटली नाही. त्यांच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली. दुर्दैवाने आपल्याला आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतिकारक परिचित आहे, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिकारकांच्या बलिदानाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून अपरिचित अशा साडे बारा हजार क्रांतिकारकांची गाथा देशासमोर येत असल्याचेही ते म्हणाले.

 

क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या वाड्यातील संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार रावळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. चापेकर वाडा येथील राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. त्यानंतर प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

 

"चापेकर बंधुंनी क्रांतिकार्याबरोबरच समाजसुधारणांचेही कार्य केल्याचे गौरवपुर्ण उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले, "स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवा. त्यासाठी चापेकर स्मारकाला विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या तर संस्कार होतील." चापेकर बंधुंचे स्मारक हे अप्रतिम  आणि प्रेरणा देणारे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, "चापेकर बंधुंनी केलेला रॅंडचा वध हा जनजागृतीची ठिणगी आणि देशाभिमानाचा हुंकार होता. अशा स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातूनच देश घडला आहे. त्यातूनच देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम आहे." कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश प्रभुणे यांनी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश पाठवून चापेकरांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

समरसता गुरूकुलम सामाजिक उत्थानाचे केंद्र :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला भेट दिली. वंचित समाजातील विशेषतः पारथी समाजातील विद्यार्थ्यांची निवासी शाळा असलेल्या या गुरूकुलातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. पारंपारिक कौशल्यांबरोबरच विद्यार्थी आधुनिक कौशल्य आणि कला आत्मसात करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"वंचित समाजाला पायावर उभे करणारा आदर्श आणि उत्तम नमुना म्हणजे हे गुरुकुलम् आहे."

 

असे आहे चापेकरांचे स्मारक :

दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर यांच्या पुर्वजांचे घर असलेल्या ठिकाणी हे राष्ट्रीय संग्रहालय उभे आहे. ज्यामध्ये चापेकर बंधुंचा संघर्ष आणि स्वातंत्र्यातील बलिदानाचे १३ भावस्पर्शी प्रसंगांचे सादरीकरण आहे. गुप्त बैठका, इंग्रजांच्या विरोधातील कट आणि जनतेसमोर केलेल्या क्रांतिकारक भाषणांचे क्षणही यात उभे करण्यात आले आहे. दृकश्राव्य अॅनिमेशनचाही यात वापर करण्यात आला आहे. ज्याचे लोकार्पण आज झाले. तसेच चापेकर वाड्याच्या मागेच राष्ट्रीय संग्रहालयाचे कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले. ज्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये भारताच्या प्राचिन काळापासूनचा सांस्कृतिक विकास आणि समाजाचे पुनरूत्थान मांडण्यात येणार आहे. ज्यात विज्ञान, कला, कौशल्य, इतिहास, पुरावे, पुरातत्वीय अवशेष, खगोलीय बदल आदींचा समावेश असेल. त्रिमितीय मॉडेल्स, एआर, प्रोजेक्शन स्क्रिन, दडगी भित्तीचित्रे यात असतील. महाराष्ट्र दिनापासून हे स्मारक सर्वांसाठी खुले होईल. यावेळी स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, विश्वस्त मिलिंद देशपांडे, विश्वस्त आणि संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोडद येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई
पुढील बातमी
चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

संबंधित बातम्या