सातारा : बकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
बकरी ईद निमित्त प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सहायक आयुक्त डॉ. नितीन मगर,डॉ. सोमनाथ गावडे यांच्यासह पशुसंर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तात्पुरत्या कत्तल खाण्याला सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, तात्पुरत्या कत्तलखाण्यासंदर्भात सर्व नगर पालिका, नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. त्यांना महराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 ची कत्तल खाण्यासाठी द्यावयाच्या सुविधांची माहिती द्या.
वाहतूक अधिनियम 1978 मधील नियम 47 अन्वये वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतुकीपुर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात आरोग्य तपासणी करावी. सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांनी वाहतूक होणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र द्यावे. ईद निमित्त उभारण्यात येणाऱ्या कत्तलखाण्यांना सर्व सहकार्य करावे. त्याचबरोबर कत्तल झाल्यानंतर त्याचा इतर लोकांना त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्र शासनाने गायी, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्याचे रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांचे कत्तलीस निर्बंध घालण्यासाठी महराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि. 4 मार्च 2015 पासून लागू केला आहे याचीही पशुसंवर्धन विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिल्या.